भारताने फेटाळली अमेरिकेची टिप्पणी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
केजरीवाल यांची अटक आणि काँग्रेसची बँक खाती गोठविण्यासंबंधी अमेरिकेने केलेली आणखी एक टिप्पणी भारताने फेटाळली आहे. केजरीवाल यांच्या अटकेसंबंधी अमेरिकेच्या विदेश व्यवहार विभागाने चार दिवसांपूर्वी प्रतिक्रिया देताना केजरीवाल यांच्या विरोधात पारदर्शी आणि न्यायोचित पद्धतीने कारवाई केली जाईल, अशी भाषा केली होती. त्यानंतर भारताने अम्।sरिकेच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करुन अमेरिकेच्या भारतातील दूतावास उपाधिकाऱ्यांना पाचारण केले होते. तसेच भारताच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये लक्ष न घालण्याची सूचना केली होती. त्यानंतर, अमेरिकेने पुन्हा एकदा केजरीवाल यांच्या अटकेसंदर्भात टिप्पणी केली. आम्ही आमच्या पूर्वीच्या वक्तव्यावर ठाम आहोत. कायदेशीर कारवाई पारदर्शी पद्धतीने व्हावी, असे आमचे मत होते आणि हे मत कोणालाही मान्य होण्यासारखेच आहे. या मतप्रदर्शनात काहीच वावगे नाही, अशी प्रतिक्रिया अमेरिकेकडून बुधवारी व्यक्त करण्यात आली होती. ही प्रतिक्रियाही भारताने फेटाळली आहे. भारतात कायदेशीर प्रक्रिया नेहमीच नियमांना धरुन होत असते. ज्या देशांमध्ये अशीच स्थिती आहे आणि जे देश लोकशाहीच्या तत्वांच्या अनुसार चालतात त्यांना भारतातली कायदा प्रक्रिया समजून घेण्यात अडचण येऊ नये. आपल्या स्वतंत्र आणि भक्कम लोकशाही संस्थांसंबंधी भारताला अभिमान आहे. आमच्या संस्थांचे बाह्या हस्तक्षेप आणि प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. परस्पर सन्मान आणि परस्परांविषयी सद्भावना यावरच आंतरराष्ट्रीय संबंध आधारित असतात. सर्व देशांनी एकमेकांचे सार्वभौमत्व आणि देशांतर्गत अधिकार यांचा सन्मान ठेवला पाहिजे. या पायावरच आम्ही अमेरिकेच्या विधानांना आक्षेप घेत आहोत, असे भारताने नव्या वक्तव्यात स्पष्ट केले आहे.