भारत-पाक तणाव दूर करतील
अमेरिकेच्या अध्यक्षांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देश परस्परांच्या संबंधांमध्ये आलेला तणाव दूर करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
पाकिस्तान आणि भारतादरम्यान मोठा तणाव आहे, परंतु दोन्ही देश कुठल्याही मार्गाने यावर तोडगा काढतील. दोन्ही देशांच्या नेत्यांना मी ओळखतो असे ट्रम्प यांनी एअरफोर्स वनच्या विमानात पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावर पत्रकारांनी ट्रम्प यांना दोन्ही देशांच्या नेत्यांशी संपर्क साधणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देणे टाळले.
अमेरिकेचे नेतृत्व थेट स्वरुपात नसले तरीही पडद्याआडून दोन्ही देशांच्या नेतृत्वाशी संपर्कात असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दूरध्वनीवरून संपर्क साधत अमेरिका भारतासोबत उभा असल्याचे यापूर्वीच कळविले आहे. भारताने या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने कारवाईचे पाऊल उचलल्यास अमेरिकेचा पाठिंबा मिळणार असल्याचे मानले जात आहे.
याचदरम्यान पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी विदेशी राजनयिकांना भारतासोबत वाढत्या तणावाबद्दल माहिती दिली आहे. विदेश सचिव आमना बलूच यांनी इस्लामाबादमध्ये मिशन प्रमुख आणि राजनयिकांना पहलगाम हल्ल्यानंतरच्या घटनाक्रमांची माहिती दिल्याचे पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने वक्तव्य जारी करत सांगितले आहे.