भारताला मिळाले मोंगला बंदराचे टर्मिनल
बांगलादेशकडून झुकते माप : चीनचे प्रयत्न ठरले अयशस्वी
वृत्तसंस्था/ ढाका
भारताने हिंदी महासागरातील चीनच्या वाढत्या प्रभावादरम्यान एक मोठे यश मिळविले आहे. भारताने बांगलादेशसोबत मोंगला बंदराच्या टर्मिनलच्या संचालनासाठी करार केला आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी अलिकडेच चीनचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान चीनने मोंगला बंदरासंबंधी हसीना यांच्याकडे आग्रह धरला होता. तरीही मोंगला बंदराच्या टर्मिनलचे संचालन स्वत:कडे मिळविण्यासाठी भारत यशस्वी ठरला आहे.
भारताच्या या कराराला हिंदी महासागरात चीनला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. चीन देखील या बंदरावर स्वत:ची नजर ठेवून होता. मोंगला बंदर हे चितगाव बंदरानंतर बांगलादेशचे दुसऱ्या क्रमांकाचे बंदर आहे. तसेच भारताकडे आता एकूण तीन विदेशी बंदरांच्या संचालनाची जबाबदारी असणार आहेत.
यापूर्वी भारताने चालू वर्षात म्यानमारसोबत स्वात्ते बंदर आणि इराणसोबत चाबहार बंदरासंबंधी करार केला आहे. मोंगला बंदराशी निगडित कराराचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. या टर्मिनलचे संचालन इंडिया पोर्ट ग्लोबल लिमिटेडकडून (आयपीजीएल) केले जाणार आहे.
मोंगला बंदर विशेष का?
मोंगला बंदर करार भारतासाठी संपर्कव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण आहे. या बंदराच्या माध्यमातून भारताला ईशान्येतील राज्यांपर्यंत संपर्कव्यवस्था वाढविण्यास मदत मिळणार आहे. तसेच यामुळे चिकन नेक किंवा सिलिगुडी कॉरिडॉरवरील दबाव कमी होणार आहे. याचबरोबर चीनला रोखण्यासाठी हे बंदर अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात स्वत:चा प्रभाव वाढविण्यासाठी चीन जिबूतीमध्ये 652 कोटी तर पाकिस्तानच्या ग्वादारमध्ये 1.3 लाख कोटी रुपयांच्या निधीतून बंदर विकसित करत आहे.
भारत खूपच मागे
कंटेनर ट्रॅफिकप्रकरणी आघाडीच्या 10 बंदरांमध्ये भारताचे एकही बंदर सामील नाही. तर आघाडीच्या 10 मध्ये चीनची 6 बंदरे सामील आहेत. मोंगला बंदराचे संचालन हिंदी महासागरात भारताच्या बंदर संचालन क्षमता दाखवून देण्याची उत्तम संधी ठरणार आहे. भारताला जागतिक स्तरावर बंदर संचालनाच्या क्षेत्रात अद्याप कमकुवत मानले जाते. विदेशात बंदराचे संचालन कुठल्याही देशाच्या सागरी क्षमेतला वाढविण्यास बळ पुरविते. चीनने आतापर्यंत 63 हून अधिक देशांच्या 100 पेक्षा अधिक बंदर प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे.