अठ्ठेचाळीस तासांमध्ये नेता निवडू !
लोकसभा निवडणुकीची मतगणना झाल्यानंतर अवघ्या 48 तासांमध्ये विरोधी पक्षांची आघाडी आपल्या नेत्याची निवड करणार आहे. या कामासाठी वेळ लावला जाणार नाही. आघाडीतील ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील, त्याच पक्षाचा नेता आघाडीचाही नेता निसर्गक्रमाने होऊ शकतो, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी केला आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत यांनी हा दावा केला. विरोधी पक्षांच्या आघाडीला बहुमत मिळेल असे प्रतिपादन त्यांनी केले. मतगणनेनंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील पक्षांना विरोधी पक्षांच्या आघाडीचे दरवाजे खुले असतील काय या प्रश्नावर त्यांनी सावध उत्तर दिले. नितीशकुमार हे आघाडीवरचे ‘पलटू’ नेते आहेत. मात्र, या संबंधात विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेते एकत्रिरित्या विचार करुन निर्णय घेतील, असे प्रतिपादन त्यांनी केले.
किती जागा मिळतील...
लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या आघाडीला किती जागा मिळतील ही संख्या मी सांगू शकणार नाही. पण आम्हाला बहुमत मिळेल. बहुमतासाठी 272 जागा आवश्यक आहेत. त्यापेक्षा जास्त जागा आम्ही मिळविणार आहोत. नेमक्या किती जागा आम्हाला मिळणार, हे 4 जूनला समजणार आहे, असे ते म्हणाले.
2004 प्रमाणे होणार...
2004 च्या लोकसभा निवडणुकीत अनपेक्षितरित्या काँग्रेस आघाडीला जास्त जागा मिळाल्या होत्या. तशाच प्रकारे सध्याचेही वातावरण असून विरोधी पक्षांच्या आघाडीला यश मिळणार आहे. भारतीय जनता पक्षाचे धोरण ‘अन्नदाताओंका अपमान और चंदादाताओंका सन्मान’ असे आहे. आमचे धोरण गरीबांच्या कल्याणाचेच असेल, असाही विश्वास त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात व्यक्त केला.