भारत बनला जगातील सहवा सर्वात श्रीमंत देश
नाइट फ्रँकच्या अहवालानुसार माहिती सादर : धनाढ्या लोकांचे वास्तव्य शहरांमध्ये अधिक
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारत जगातील सहावा सर्वात श्रीमंत देश बनला आहे. भारतातील श्रीमंत लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जागतिक स्तरावर अतिश्रीमंत लोकसंख्येच्या बाबतीत भारताने आता सहावे स्थान मिळवले आहे. येत्या काही वर्षांत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. एका अहवालानुसार, आर्थिक विकास, तंत्रज्ञान क्षेत्र आणि वाढत्या गुंतवणुकीच्या संधींमुळे भारतातील संपत्ती सातत्याने वाढत असल्याची माहिती आहे. नाइट फ्रँकच्या अहवालानुसार, 2026 साली भारतात 19,877 लोक असे असतील ज्यांची संपत्ती 30 दशलक्ष डॉलर्स किंवा सुमारे 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल. ही संख्या जागतिक अतिश्रीमंत लोकसंख्येच्या 2.8 टक्के आहे.
गेल्या 5 वर्षांत हा आकडा 2 टक्क्यांवरून 2.8 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. भविष्यात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. 2031 पर्यंत भारतातील अतिश्रीमंत व्यक्तींची संख्या 27 टक्क्यांनी वाढून 25,217 पर्यंत पोहोचू शकणार असल्याचा अंदाज आहे. अतिश्रीमंत व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती, जिच्याकडे 30 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त मालमत्ता आहे. जागतिक स्तरावरही श्रीमंतांची संख्या वाढली आहे. 2021 मध्ये अतिश्रीमंत व्यक्तींची संख्या 5.5 लाख होती, जी 2026 पर्यंत 7.1 लाखांपर्यंत वाढली आहे, म्हणजेच दररोज सुमारे 89 नवीन अतिश्रीमंत व्यक्ती या यादीत समाविष्ट होत आहेत.
भारतातील अब्जाधीशांची संख्या
अतिश्रीमंत व्यक्तींसोबतच, भारतातील अब्जाधीशांची संख्याही वेगाने वाढत आहे. 2026 साली अब्जाधीशांची संख्या 207 असेल, जी गेल्या 5 वर्षांत 58 टक्क्यांनी वाढली आहे. 2031 पर्यंत ही संख्या 51 टक्क्यांनी वाढून 313 पर्यंत पोहोचू शकते.