अभूतपूर्व गोंधळानंतर भारत - बांगलादेश संयुक्त विजेते घोषित
वृत्तसंस्था/ ढाका
भारताला गुरुवारी यजमान बांगलादेशसह ‘सॅफ’ 19 वर्षांखालील महिला फुटबॉल स्पर्धेचे संयुक्त विजेते घोषित करण्यात आले. विजेता ठरविण्यासाठी नाणेफेकीचा अवलंब करण्यात आला असता, सुरुवातीला भारताला वाटले होते की, त्यांनी नाणेफेकीत जेतेपद पटकावले आहे. मात्र सामनाधिकाऱ्यांनी नंतर निर्णय बदलला.
नियमानुसार 90 मिनिटांचा खेळ संपला, तरी 1-1 अशी बरोबरी कायम राहिल्याने पंचांनी थेट पेनल्टी शूटआउटचा आदेश दिला. विशेष म्हणजे गोलरक्षकांसह दोन्ही बाजूंच्या सर्व 11 खेळाडूंनी पेनल्टी किकचे गोलमध्ये रूपांतर केले. गोलसंख्या 11-11 अशी झाल्यानंतर पंच पेनल्टी शूटआउट सुरू ठेवणार होत्या. तेवढ्यात त्यांना तसे न करण्यास सांगण्यात आले.
त्यानंतर अचानक पंचांनी दोन्ही बाजूंच्या कर्णधारांना बोलावले आणि नाणेफेक झाली. नाणेफेकीत भारत भाग्यवान ठरल्याने त्यांनी आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. पण बांगलादेशच्या संघाने विरोध केला आणि त्यांच्या खेळाडूंनी बराच वेळ मैदान सोडण्यास नकार दिला. यावेळी सगळीकडे गोंधळाचे वातावरण होते आणि स्टेडियममध्ये उपस्थित मोठा जमाव मैदानावर बाटल्या फेकून घोषणाबाजी करताना दिसत होता.
एक तासाहून अधिक कालावधीनंतर सुरुवातीला नाणेफेक करण्याचा जो निर्णय सामना आयुक्तांनी घेतला होता तो बदलण्यात आला आणि भारत व बांगलादेशला संयुक्त विजेते घोषित करण्यात आले. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ याबाबतीत चांगल्या पद्धतीने वागला. आम्ही दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करण्याचा निर्णय स्वीकारला, असे ‘एआयएफएफ’च्या सूत्रांनी सांगितले. स्पर्धेच्या नियमांबाबत सामनाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम होता, त्यामुळे अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला.