भारत-द. आफ्रिका टी-20 मालिका आजपासून
वृत्तसंस्था/चेन्नई
यजमान भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला येथे शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. या सामन्याला शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता प्रारंभ होईल. कर्णधार हरमनप्रित कौर आता वनडे आणि कसोटी मालिका जिंकल्यानंतर टी-20 मालिकेत जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे. दक्षिण आफ्रिका महिला संघाने भारताच्या दौऱ्यात आतापर्यंत दोन मालिका गमविल्या आहेत. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत द. आफ्रिकेला व्हाईटवॉशला सामोरे जावे लागले. तर उभय संघातील एकमेव कसोटी सामन्यात भारताने द. आफ्रिकेचा मोठ्या फरकाने पराभव करताना फॉलोऑन लादला होता. आता उभय संघातील टी-20 मालिका चुरशीची होईल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. 19 जुलै रोजी लंकेत सुरु होणाऱ्या महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेपूर्वीची भारतीय संघाची ही शेवटची मालिका आहे.
भारतीय संघाची उपकर्णधार आणि सलामीची फलंदाज स्मृती मानधानाची फलंदाजी चांगलीच बहरलेली आहे. तिने तीन वनडे सामन्यात 2 शतके आणि 1 अर्धशतक झळकविले होते. त्याच प्रमाणे कर्णधार हरमनप्रित कौरने या मालिकेतील शेवटच्या सामन्यात शतक नोंदवून फलंदाजीचा सूर मिळविला होता. कसोटी सामन्यात सलामीची फलंदाज शेफाली वर्माने द्विशतक झळकविले होते. रॉड्रीग्ज आणि रिचा घोष यांची फलंदाजीही चांगली झाली होती. भारतीय संघाच्या गोलंदाजीही भिस्त प्रामुख्याने अरुंधती रे•ाr, रेणूकासिंग ठाकुर, पूजा वस्त्रकर, दिप्ती शर्मा, राधा यादव, आशा शोभना आणि श्रेयांका पाटील यांच्यावर राहिल. द. आफ्रिकन संघातील बरेच खेळाडू सूर मिळविण्यासाठी झगडत आहेत. कर्णधार हूलव्हर्ट, अष्टपैलु ट्रायॉन, कॅप, सुने लूस, बॉश्च, ब्रिटस् यांच्याकडून दमदार फलंदाजी होणे गरजेचे आहे. मलाबा, क्लास, डी क्लर्क आणि खाका हे दक्षिण आफ्रिकन संघातील प्रमुख गोलंदाज आहेत. चेन्नईच्या चिदंबरम् स्टेडीयमची खेळपट्टी संथ असल्याने फिरकी गोलंदाज प्रभावी ठरतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.