भारत-द.आफ्रिका दुसरा टी-20 सामना आज
वृत्तसंस्था/चेन्नई
यजमान भारत आणि द. आफ्रिका महिला क्रिकेट संघामध्ये येथे रविवारी दुसरा टी-20 सामना खेळविला जाणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत द. आफ्रिकेने भारताचा पहिल्या सामन्यात पराभव करुन आघाडी मिळविली आहे. दरम्यान हरमनप्रित कौरचा संघ रविवारचा सामना जिंकून बरोबरी करण्यासाठी सज्ज झाला आहे.
द. आफ्रिका महिला संघाला भारताच्या दौऱ्यामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका आणि त्यानंतर एकमेव कसोटी सामना गमवावी लागली. पण शुक्रवारी चेन्नईत त्यांनी टी-20 मालिकेतील पहिला सामना जिंकून या दौऱ्यातील आपल्या विजयाचे खाते उघडले. भारतीय महिला संघाला पहिल्या सामन्यात द. आफ्रिकेकडून हार पत्करावी लागली. कारण भारताचे क्षेत्ररक्षण दर्जेदार झाले नाही. भारताकडून किमान तीन सोपी जिवदाने द. आफ्रिकेला मिळाल्याने त्यांनी हा सामना जिंकला. रविवारच्या दुसऱ्या जिंकण्यात रिचा घोषच्या तंदुरुस्तीबाबत साशंकता व्यक्त केली जाते. पहिल्या सामन्यात झेल टिपण्याच्या प्रयत्नात चेंडू तिच्या तोंडावर आदळल्याने तिला काही वेळ वेदना जाणवल्या.
रविवारच्या सामन्यात भारतीय संघाला फलंदाजी तसेच गोलंदाजीतही दर्जेदार कामगिरी करावी लागेल. कर्णधार कौर, मानधना आणि रॉड्रीग्ज यांची फलंदाजी पहिल्या सामन्यात बऱ्यापैकी झाली असली तरी त्यांना विजयासाठी दुसऱ्या सामन्यात अधिक धावा जमवाव्या लागतील. द. आफ्रिकेची कर्णधार वूलव्हर्ट, कॅप, ब्रिटस्, ट्रायोन यांना मात्र सूर मिळल्याचे जाणवते. नाणेफेकीचा कौल महत्वाचा राहिल. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता प्रारंभ होईल.