पाकिस्तानात अपक्षांची ‘शतकी’ खेळी
आता आघाडी सरकार स्थापन करण्यासाठीचे प्रयत्न तीव्र
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने रविवारी सार्वत्रिक निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर केले. तुऊंगात बंद माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाच्या समर्थनार्थ अपक्ष उमेदवारांनी 101 जागा जिंकल्या. तर नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल-एन) हा पक्ष 75 जागा जिंकून तांत्रिकदृष्ट्या संसदेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. आता सार्वत्रिक निवडणुकीत खंडित जनादेश समोर आल्यानंतर राजकीय पक्षांनी आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी आपले प्रयत्न तीव्र केले आहेत.
पाकिस्तान निवडणुकीच्या निकालाबाबत गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेला गोंधळ अखेर मिटला आहे. पाकिस्तानमध्ये गुऊवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाले. या रणधुमाळीत इम्रान खान यांचा पक्ष ‘पीटीआय’च्या उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. आतापर्यंत हेच अपक्ष उमेदवार टेंडमध्ये आघाडीवर होते. मात्र, निवडणूक निकाल आणि मतदानातही इम्रानवर हेराफेरीचे आरोप करण्यात आले. मात्र आता त्याचे निकाल समोर आले आहेत.
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार जाहीर झालेल्या निकालांमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार इम्रान खान यांच्या पक्षाने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांनी 101 जागा जिंकल्या असून तीनवेळा माजी पंतप्रधानपद भूषवणाऱ्या नवाझ शरीफ यांचा पीएमएल-एन) 75 जागांवर विजय संपादन केला. बिलावल झरदारी भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला 54 जागा मिळाल्या, तर मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट पाकिस्तान (एमक्यूएम-पी) गटाला 17 जागा मिळाल्या. तसेच छोट्या पक्षांनी 12 जागा जिंकल्या आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला 133 जागांची आवश्यकता असेल. मात्र सध्या कोणताही एक पक्ष सरकार बनवू शकत नाही.
माजी पंतप्रधान नवाझ शरीफ, माजी पंतप्रधान इम्रान खान तसेच परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो या तिन्ही नेत्यांनी संसदीय निवडणुकीत आपापल्या पक्षांना आरामदायी विजयाची आशा व्यक्त केली होती, परंतु आता प्रत्येक पक्षाला सत्तेसाठी आव्हानात्मक वाटचाल करावी लागत आहे. सत्तेच्या समीकरणात अपक्ष उमेदवार महत्त्वाची भूमिका बजावणार असून त्यांच्या सहकार्यानेच पाकिस्तानमध्ये पुढचे सरकार स्थापन होणार असल्याचे वृत्त आहे. निवडणुकीदरम्यान झालेल्या गैरप्रकारांमुळे काही निवडक भागात फेरमतदान घेण्याची तयारी आयोगाने केली आहे. त्यानुसार 15 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे.