केळशी किनाऱ्यावर भटक्या कुत्र्यांकडून हल्ल्याचे वाढते प्रकार
सरपंचांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, उपाययोजनेची मागणी
मडगाव : केळशी गावात आणि विशेषत: समुद्रकिनाऱ्यावर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव जाणवत आहे. हे कुत्रे मोठ्या संख्येने असतात. सध्या किनाऱ्यावर शॅक नसल्याने या कुत्र्यांना खाण्यासाठी अन्न मिळत नसते. परिणामी, उपासमारीने ते लोकांवर हल्ला करत असतात. या प्रकरणी लक्ष घालून उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी केळशी सरपंच डिक्सन वाझ यांनी केली आहे. अलीकडे आपण पर्यटकांवर तसेच समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जाणाऱ्या स्थानिकांवर कुत्र्यांकडून बरेच हल्ले झाल्याचे पाहिले आहे. ही एक गंभीर समस्या असून पर्यटन व्यवसाय लक्षात घेऊन तातडीने यावर उपाय करणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात गोवा अनुभवण्यासाठी कित्येक पर्यटक येथे येतात. त्यांना आम्ही सुरक्षा पुरविणे आवश्यक असल्याचे वाझ यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्ती कायद्यांतर्गत तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी वाझ यांनी शुक्रवारी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू यांना एक निवेदन सादर करून केली आहे. सदर निवेदनाची प्रत बाणवलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनाही पाठविण्यात आली आहे. कुत्रे चावे घेत असल्याचे आपल्या नजरेस आणून दिले गेले असून आपण पंचायत, पालिका,पशुसंवर्धन विभाग व पर्यटन विभाग प्रमुखांची बैठक घेऊन आवश्यक तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी चंद्रू यांनी सांगितले.