कारवार जिल्ह्यातील प्रकल्पस्थळाच्या सुरक्षेत वाढ
भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम : अणुभट्ट्यांच्या सुरक्षेत वाढ : मासेमारी करणाऱ्या होड्यांचीही कसून चौकशी : अरबी समुद्राच्या हालचालींवरही करडी नजर
कारवार : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धसदृश्य परिस्थितीमुळे कारवार जिल्ह्यातील किनारपट्टीसह जिल्ह्यातील प्रकल्पस्थळी सुरक्षितता वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील अतिसंवेदनशील प्रदेशामुळे कारवार तालुक्यातील सरकारने यापूर्वीच कॅटेगरी टूमध्ये समावेश केला आहे. येथून 55 ते 66 किलो मीटर अंतरावरील राज्यातील एकमेव कैगा अणुउर्जा प्रकल्प सुरक्षिततेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षीतता दलाकडे सोपविण्यात आली आहे. प्रत्येकी 220 मेगावॅट क्षमतेच्या चार अणुभट्ट्या कार्यरत आणि प्रत्येकी 100 मेगावॅट क्षमतेच्या दोन अणुभट्ट्या निर्मिती अवस्थेत असलेल्या कैगा अणुउर्जा प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत एरव्ही अजिबात तडजोड केली जात नाही आणि आता देशात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कैगा प्रकल्पातील सुरक्षितता अधिक मजबूत करण्यात आली आहे.
प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारासह प्रकल्प प्रदेशात ठिकठिकाणी बंदुकधारी सीआयएसएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. राज्याचे गृहमंत्री परमेश्वर यांच्या सुचनेनुसार काळीनदीवरील गणेशगुढी, कोडसळ्ळी, बोमनहळ्ळी, कद्रा आणि कोडसळ्ळी जलाशयावरील सुरक्षिततेत वाढ करण्यात आली आहे. हीच बाब शरावती नदीवरील गीरसप्पा टेलरसेवर जलाशयावर दिसून येत आहे. गणेशगुढी, अंबीकानगर, कद्रा, कोडसळ्ळी आणि गीरसप्पा येथे जलविद्युत निर्मिती केंद्र कार्यरत आहे. या जलविद्युत केंद्रातून प्रत्येक दिवशी हजारो मेगावॅट विद्युत निर्मिती होत असते. त्यामुळे सरकारने विद्युत निर्मिती केंद्राच्या बाबतीत धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता सरकारने कर्नाटक विद्युत महामंडळाला विद्युत निर्मिती केंद्रावर बारीक नजर ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.
समुद्रातील गस्त वाढविण्यात आली आहे
कारवार जिल्ह्याला सुमारे 140 कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. येथून 5 ते 6 कि.मी. अंतरावर दक्षिण आशिया खंडातील सर्वात मोठा गणला जाणारा सीबर्ड नाविकदल प्रकल्प आकार घेत आहे. या शिवाय येथे कारवार वाणिज्य बंदर कार्यरत आहे. आणि मुदगा, बैतखोल, बेलेकेरी, होन्नावर, नदडी आदी ठिकाणी मच्छीमारी बंदरे कार्यरत आहेत. मुंबईवर हल्ला केलेले दहशतवादी समुद्र मार्गेच दाखल झाले होते. याची जाणीव सरकारसह सर्वांना आहे आणि म्हणूनच अरबी समुद्रातील प्रत्येक हालचालींवर सुरक्षा यंत्रणाचे बारीक लक्ष आहे. मासेमारीसाठी समुद्रात उतरणाऱ्या आणि मासेमारी करून परतणाऱ्या होड्यांची आणि होड्यांवरील कामगारांची कसून चौकशी केली जात आहे. अन्य राज्यातील कामगारांची पार्श्वभूमी तपासली जात आहे. अरबी समुद्रात इंडीयन कोस्ट गार्ड आणि कोस्टल पोलिसांच्या गस्तमध्ये वाढ करण्यात आली आहे.
कोकण रेल्वे स्थानकावरील सुरक्षिततेत वाढ
किनारपट्टीवरील पाच तालुक्यातील कोकण रेल्वे मार्गावर छोटी मोठी अनेक रेल्वे स्थानके आहेत. रेल्वेस्थानकासह पर्यटनस्थळावरील सुरक्षितेतही वाढ करण्यात आली आहे. दरम्यान देशात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन कारवार जिल्हा पोलीस प्रमुख एन. नारायण यांनी केले आहे.