For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाढत्या उष्म्यामुळे विजेच्या मागणीत वाढ

09:36 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
वाढत्या उष्म्यामुळे विजेच्या मागणीत वाढ
Advertisement

10 मेगावॅट विजेची मागणी वाढली :  वाढीव विद्युतबिल भरावे लागणार

Advertisement

बेळगाव : बेळगावमध्ये उष्म्याचे प्रमाण वाढले असून मंगळवारी किमान तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. वाढत्या उष्म्यामुळे मागील काही दिवसांमध्ये विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. बेळगाव शहराला 165 ते 170 मेगावॅट विजेची गरज असते. सध्या यामध्ये 10 मेगावॅटची वाढ झाली असून दररोज 180 ते 185 मेगावॅट वीज वापरली जात आहे. उष्म्यामध्ये वाढ झाल्यानंतर एसी, कूलर, रेफ्रिजरेटर, पॅन यांचा वापर वाढतो. दिवसा व रात्रीही घर-कार्यालयांमध्ये पंखे सुरूच असतात. या सर्वांचा परिणाम विजेच्या वापरावर होत असतो. प्रत्येक महिन्यात होणाऱ्या सरासरी वापरापेक्षा अधिक वापर उन्हाळ्याच्या दिवसात होतो. शहरामध्ये येणाऱ्या एकूण विजेपैकी 5 मेगावॅट वीज ही पवन ऊर्जेच्या माध्यमातून येते. तर अंदाजे एक मेगावॅट वीज सोलार प्रकल्पातून शहराला पुरविली जातो. उर्वरित विद्युतपुरवठा धारवाड येथील नरेंद्र केंद्रामधून केला जातो.

वापरामुळे बिलात वाढ

Advertisement

उन्हाळ्याच्या दिवसात विजेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याने याचा परिणाम विद्युतबिलामध्ये होत आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा बसू लागल्याने विजेचा वापर वाढला आहे. गृहज्योती योजनेमुळे घरगुती ग्राहकांना सरासरी इतका वापर केल्यास विद्युतबिल माफ करण्यात आले आहे. परंतु वाढत्या उष्म्यामुळे वापर वाढल्यामुळे मार्च महिन्यात अनेक ग्राहकांना वाढीव विद्युतबिल भरावे लागले आहे.

तरी भारनियमनाचे संकट उद्भवणार नाही

शहरातील तापमान वाढले असल्याने विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. बेळगाव शहराच्या विजेच्या मागणीत 10 मेगावॅटने वाढ झाली आहे. केपीटीसीएलकडे मुबलक विद्युत असल्याने मागणी वाढली असली तरी भारनियमनाचे संकट उद्भवणार नाही.

-ए. एम. शिंदे (साहाय्यक कार्यकारी अभियंते)

Advertisement
Tags :

.