For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शालेय अभ्यासक्रमात सीमाप्रश्नाबाबत चुकीचा उल्लेख

06:08 AM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
शालेय अभ्यासक्रमात सीमाप्रश्नाबाबत चुकीचा उल्लेख
Advertisement

सातवीच्या समाज विज्ञान पुस्तकातील प्रकार

Advertisement

► प्रतिनिधी/ बेळगाव

मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या कर्नाटक सरकारने पुन्हा एक खुरापत केली आहे. आता मराठी विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यापर्यंत सीमाप्रश्नाचा चुकीचा उल्लेख पोहोचविला जात आहे. सातवीच्या समाज विज्ञान विषयाच्या पुस्तकात कन्नड राज्याभिमान पटवून देताना बेळगावचा सीमाप्रश्न, तसेच महाजन आयोगाबद्दल चुकीची माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

इयत्ता सातवीच्या समाज विज्ञान विषयाच्या पुस्तक क्रमांक 2 मध्ये अनेक चुकीचे उल्लेख करण्यात आले आहेत. भाषावार प्रांतरचना होताना राज्यांमधील वाद कशा पद्धतीने होता याची माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांना सीमाप्रश्नाबाबत चुकीची माहिती दिली जात असल्याने पालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. राज्याचा इतिहास देताना किमान चुकीची माहिती तरी देऊ नये, असा सूर मराठी भाषिक पालकांमधून आळविला जात आहे.

सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी 1965 मध्ये न्यायमूर्ती महाजन यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, केरळ या भूभागाचा अभ्यास केला. महाराष्ट्रातील अक्कलकोट, जत व केरळचा कासरगोड कर्नाटकाला तर कर्नाटकातील केवळ निपाणी, खानापूर, हल्याळ हा भाग महाराष्ट्राला जोडला जावा, असा अहवाल केंद्राला सादर केला. परंतु महाराष्ट्राला कमी गावे मिळत असल्याने तो फेटाळला, असा चुकीचा उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे.

...म्हणे चंदगडमध्ये सर्वाधिक कन्नड भाषिक

या पुस्तकामध्ये अनेक चुकीचे उल्लेख करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील चंदगड, सोलापूर, जत, अक्कलकोट या प्रदेशातील अधिक कन्नड बोलणाऱ्या लोकांचा कर्नाटकात समावेश करण्यास हवा होता. पण ते दुसऱ्या राज्यात राहिले, असा उल्लेख पुस्तकात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड हा 100 टक्के मराठी भाषिक तालुका असतानाही पुस्तकामध्ये चंदगडबाबत चुकीचा उल्लेख करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.