जाहीरनाम्यात सीमाप्रश्नाचा समावेश करा
युवा कार्यकर्त्यांचे महाराष्ट्रातील नेत्यांना पत्र
बेळगाव : मागील 68 वर्षांपासून कर्नाटकात खितपत पडलेल्या सीमावासीयांच्या व्यथा महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला समजण्यासाठी राष्ट्रीय पक्षातील नेत्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक सभेत सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीबाबत जाहीर भूमिका मांडावी. जाहीरनाम्यात सीमाप्रश्नाची सोडवणूक व सीमाभागातील भाषिक सक्ती हे विषय समाविष्ट करावेत, अशी मागणी म. ए. समितीच्या युवा कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना केली आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना सीमावासीयांचा विसर पडला आहे. त्यामुळेच कर्नाटक सरकारकडून कन्नडसक्ती लादण्यात आली आहे. महाराष्ट्रातील जनतेला सीमाप्रश्नाची जाणिव झाल्यास मोठ्या प्रमाणात लढा उभारण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी आपल्या जाहीरानाम्यात तसेच जाहीर सभांमध्ये सीमाप्रश्नाचा समावेश करावा, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे. यावेळी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, किरण हुद्दार, रोहन लंगरकांडे, शिवाजी मेणसे, बळवंत शिंदोळकर, प्रकाश हेब्बाजी यासह इतर उपस्थित होते.