म. ए. समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचार कार्यालयाचे खानापुरात उद्घाटन
खानापूर : समितीचा लढा हा प्रत्येक मराठी माणसाचा लढा असून मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सर्वांनी कटिबद्ध होणे गरजेचे आहे, असे मत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी कारवार लोकसभा मतदारसंघाचे समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. रविवारी दुपारी 4 वाजता बेळगाव-गोवा रस्त्यावरील एका इमारतीत समिती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सीमासत्याग्रही शंकर पाटील, मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच हुतात्म्यांच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अष्टेकर यांनी बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदार संघापेक्षा कारवार लोकसभा मतदारसंघात मराठी भाषिकांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे सर्वांनी प्रयत्न केल्यास समितीला विजय मिळणार आहे. निरंजन सरदेसाई हे अभ्यासू कार्यकर्ते आहेत. त्यांच्या माध्यमातून तालुक्यात पुन्हा एकदा समितीला बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
माजी आमदार मनोहर किणेकर यांनी बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदारसंघातून समितीने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी समितीला यश मिळणार असून येणाऱ्या काळात पुन्हा एकदा समितीची ताकद निर्माण झाल्याचे दिसून येईल. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, युवा नेते शुभम शेळके, मारुती परमेकर, विलास बेळगावकर, बाळासाहेब शेलार, गोपाळ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. उमेदवार सरदेसाई मराठी भाषेच्या रक्षणासाठी आपण सदैव कार्यरत राहणार असून सीमाप्रश्नाची सोडवणूक होईतोपर्यंत समितीच्या झेंड्याखाली लढा देत राहणार आहे. तसेच विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. हलगा ग्राम पंचायत सदस्य रणजीत पाटील यांनी प्रास्ताविक तर सीताराम बेडरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अॅड. एम. जी. पाटील, रमेश धबाले, नागेश भोसले, मुकुंद पाटील, जगन्नाथ देसाई, प्रतापराव देसाई, के. एम. घाडी, खानापूर समितीचे उपाध्यक्ष मारुती गुरव, चंद्रकांत देसाई, अमृत शेलार, पुंडलिक पाटील यांच्यासह समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.