महिला शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
परिवहनच्या बसचालकांची मनमानी : शेतकरी महिलांची गैरसोय
प्रतिनिधी/ बेळगाव
शहापूर, धामणे, येळ्ळूर, अनगोळ येथील शेतकरी महिलांना बसथांबा दिला जात नसल्याने महिला शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. परिवहनच्या बसचालक आणि वाहकांच्या मनमानी कारभाराचा फटका बसू लागला आहे. त्यामुळे महिला शेतकरी याबाबत आक्रमक झाल्या असून, येत्या दोन दिवसात आंदोलन छेडण्याच्या पवित्र्यात आहेत.
खरीप हंगामाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धडपड पाहावयास मिळत आहे. मात्र शेती कामासाठी जाणाऱ्या महिलांना येळ्ळूर, धामणे, अनगोळ मार्गावर बस थांबविली जात नसल्यामुळे पायपीट करावी लागत आहे. विशेषत: शहापूर, धामणे, येळ्ळूर, अनगोळ येथील महिला शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. परिवहनच्या बसचालक आणि वाहकाच्या मनमानी कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याची तक्रार महिलांनी केली आहे.
खासगी बस प्रवासामुळे आर्थिक भुर्दंड
शेती कामासाठी जाणाऱ्या महिलांना बस थांबविली जात नसल्याने खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक भूर्दंड बसत असल्याची तक्रार महिलांनी केली आहे. शक्ती योजनेंतर्गत महिलांचा मोफत प्रवास सुरू असला तरी येळ्ळूर, शहापूर, वडगाव, धामणे, अनगोळ येथील महिलांना मात्र खासगी वाहनानेच प्रवास करावा लागत असल्याची तक्रार महिलांनी केली आहे. याबाबत गतवर्षी शेतकरी संघटनेतर्फे परिवहनचे डीटीओ लमाणी यांची भेट घेऊन बसेस थांबविण्याची विनंती केली होती. मात्र बस चालक व वाहकांकडून मनमानी करत बस थांबविल्या जात नाहीत. त्यामुळे महिला प्रवाशांची कुचंबना होऊ लागली आहे. यासाठी येत्या एक-दोन दिवसात रयत संघटना वडगाव, शहापूर आणि शेतकरी महिलांतर्फे परिवहन कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा पवित्रा घेण्यात आला.