सिंधुदुर्गात पट्टेरी सहा वाघांचा वावर
उपवनसंरक्षकांची कबुली : तिलारी, आंबोली क्षेत्रात भ्रमंती : मायनिंग लॉबीसमोर अडचण येण्याची शक्यता
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिह्यात सहा पट्टेरी वाघांचा वावर आहे. आंबोली ते तिलारी या भागात त्यांचा हा वावर आहे, अशी कबुली उपवनसंरक्षक नवकिशोर रे•ाr यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पट्टेरी वाघांच्या अस्तित्वाबाबत वन अधिकाऱ्यांनी प्रथमच कबुली दिल्याने गेली अनेक वर्षे या वाघांच्या अस्तित्वाबाबत असलेला संभ्रम दूर झाला आहे. सिंधुदुर्गात सह्याद्री पट्टा जैवविविधतेने समृद्ध आहे. विशेषकरून सावंतवाडीतील आंबोली ते दोडामार्ग-मांगेलीपर्यंतच्या पट्ट्यात जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आहे. यामध्ये पट्टेरी वाघ, बिबटे, हत्ती, गवे, सांबर, शेकरू, साळिंदर, भेकर आदी वन्यप्राणी तसेच विविध नैसर्गिक वनस्पती व पक्षी आहेत. वनखात्यामार्फत वन्यप्राण्यांची गणती होते. परंतु या गणतीत वाघाचे अस्तित्व कुठेच आढळत नाही. सावंतवाडी-आंबोली ते मांगेलीपर्यंतचा पट्टा ‘टायगर कॉरिडॉर’ अर्थात इको-सेन्सिटिव्ह झोन जाहीर करावा, यासाठी वनशक्ती व आवाज फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये या भागात वाघाचे अस्तित्व नाकारण्यात आले होते. वन्यजीव संस्थान डेहराडून यांच्यावतीने वाघाचे सर्वेक्षण करण्यात आले. गिरीश पंजाबी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे सर्वेक्षण केले होते. त्यात वाघाचे अस्तित्व आढळले होते. परंतु वनखाते हे अस्तित्व कागदावर कधीच दाखवत नव्हते. मायनिंग लॉबीला संरक्षण देण्यासाठी वाघाचे अस्तित्व वनखाते नाकारत असल्याचा आरोप पर्यावरणवादी स्टॅलिन दयानंद, डॉ. जयंत पऊळेकर तसेच संदीप सावंत ही मंडळी करत होती. परंतु आता उपवनसंरक्षक नवकिशोर रे•ाr यांनी सहा वाघांचा वावर असल्याचे मान्य केल्यामुळे मायनिंग लॉबीसमोर मोठी अडचण येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अस्तित्व नाकारले नव्हते!
दरम्यान, उच्च न्यायालयात वनविभागाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात वाघाचे अस्तित्व नाकारलेले नाही. प्रतिज्ञापत्राचे पूर्ण वाचन केल्यास हे दिसून येईल, असे उपवनसंरक्षक रे•ाr यांनी सांगितले. खडपडे-तळकट मार्गावर पट्टेरी वाघ काहींना दृष्टीस पडला. तो कॅमेऱ्याबद्ध झाला. या पार्श्वभूमीवर रे•ाr यांना विचारले असता, त्यांनी सहा वाघांचा वावर जिल्ह्यात असल्याचे मान्य केले. तिलारी, आंबोली राखीव वनक्षेत्रात वाघाचे अस्तित्व आढळले. मात्र, वाघ एकाच जागेवर थांबत नाहीत. त्यांची भ्रमंती सुरू असते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि कर्नाटक दांडेली आणि गोवा हे आंबोली-तिलारीशी जोडले गेले आहेत. त्यामुळे या सर्व परिसरात वाघांचे भ्रमण सुरू असते, असे रे•ाr म्हणाले. तिलारी परिसरात टस्कर हत्तीसह पाच हत्ती आहेत. गवे, सांबर यांची संख्याही वाढली आहे. जिह्यात जैवविविधता मोठ्या प्रमाणात आहे. तिचे जतन झाले पाहिजे. वन्यप्राण्यांनी शेतीचे नुकसान केल्यास एक महिन्यात भरपाई देण्याचा कायदा करण्यात आला आहे. भरपाई न दिल्यास वन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी कागदपत्रे परिपूर्ण असणे आवश्यक आहे. नरेंद्र डोंगरावर पर्यटन अंतर्गत 50 लाख ऊपये खर्च करण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘टायगर कॉरिडॉर’ची मागणी
आंबोली ते मांगेलीपर्यंतच्या पट्ट्यात पट्टेरी वाघाचे अस्तित्व असल्याचे तळकट-खडपडे मार्गावर काहींना पट्टेरी वाघ दिसून आला. कॅमेऱ्यातही त्याचे शूटिंग करण्यात आले. त्यामुळे पट्टेरी वाघाचे अस्तित्व सिद्ध झाले आहे. वनविभागाने याची नोंद घेतली आहे. मांगेली ते आंबोली या परिसरात वाघाचे अस्तित्व असल्याने हा भाग ‘टायगर कॉरिडॉर’ म्हणून जाहीर करावा, अशी मागणी वनशक्ती आणि आवाज फाऊंडेशनने केली होती. या संदर्भात गेली दहा वर्षे ही संघटना उच्च न्यायालयात लढा देत आहे. या पार्श्वभूमीवर तळकट-खडपडे मार्गावर वाघ दृष्टिक्षेपास पडल्याने त्यांच्या मागणीला बळकटी मिळाली आहे.