खेमेवाडी येथे समाजकंटकाकडून गवत गंज्यांना आग
खानापूर : तालुक्यातील खेमेवाडी येथील शेतात रचून ठेवलेल्या गवत गंज्यांना समाजकंटकांनी आग लावल्याने दोन गवत गंज्या जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, खेमेवाडीतील शेतकरी परशराम सहदेवाचे आणि सिद्धाप्पा सहदेवाचे यांनी आपल्या शेतात जनावरांच्या चाऱ्यासाठी दोन गवत गंज्या रचून ठेवल्या होत्या. रविवारी रात्री उशिरा अज्ञातांनी आग लावल्याने दोन्ही गवत गंज्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. सहदेवाचे यांचे शेत गावापासून लांब असल्याने लावलेली आग कोणालाही समजून आलेली नाही. सकाळी शेतात कामासाठी गेल्यावर गवत गंज्या जळून खाक झाल्याचे दिसून आले आहे. गेल्यावर्षी पाऊस नसल्याने चाऱ्याचा प्रश्न गंभीर असल्याने शेतकऱ्याने जनावरांसाठी गवत जमा करून ठेवलेले आहे. मात्र समाजकंटकाकडून आग लावण्याचे प्रकार वारंवार होत असल्याने जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर बनत आहे. तसेच आगीच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.