फॉर्मात असलेल्या भारताचे आज कोरियाविरुद्ध पारडे भारी
वृत्तसंस्था/ हुलुनबुईर (चीन)
अजूनपर्यंत अपराजित राहिलेला आणि जेतेपदाचा भक्कम दावेदार असलेला भारत आज सोमवारी येथे आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत क्षमतेहून खराब कामगिरी केलेल्या, पण भाकीत करणे कठीण असलेल्या कोरियाविऊद्ध लढेल. यावेळी आपल्याला असलेल्या संधीचा फायदा उठविण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल.
पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदकविजेत्या भारताने या स्पर्धेत आतापर्यंत पाचही लीग सामन्यांमध्ये विजयांची नोंद केली आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाने यजमान चीनवर 3-0 असा विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली होती. त्यानंतर जपान आणि मलेशियाला त्यांनी अनुक्रमे 5-1 आणि 8-1 ने पराभूत केले. त्यापुढील सामन्यांत भारताने कोरियावर 3-1 ने आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 2-1 ने मात केली.
भारतीयांनी प्रत्येक विभागात प्राविण्य दाखविल्यामुळे ही कामगिरी उत्कृष्ट ठरली आहे, मग ती आघाडीफळो असो, मिडफिल्ड असो किंवा बचाव. साखळी टप्प्यातील भारताच्या कामगिरीचा सर्वांत आश्वासक भाग हा आघाडीपटूंचा फॉर्म राहिला आहे. पॅरिसमध्ये मैदानी गोल करण्याच्या बाबतीत दिसणाऱ्या त्रुटी ही एक मोठी चिंतेची बाब राहिली होती. परंतु येथे सुखजित सिंग, अभिषेक, उत्तम सिंग, गुरजोत सिंग, अराईजित सिंग हुंदल आणि इतरांचा समावेश असलेल्या युवा फॉरवर्ड लाइनने अपेक्षेहून चांगली कामगिरी केली आहे.
युवा मिडफिल्डर राजकुमार पालनेही काही सुरेख मैदानी गोल करत चमकदार कामगिरी केली आहे. याशिवाय अनुभवी मनप्रीत सिंग, उपकर्णधार विवेक सागर प्रसाद आणि नीलकांत शर्मा यांनीही मिडफिल्डमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतीय बचावफळीनेही दमदार कामगिरी केली असून गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठक आणि सूरज करकेरा यांनी केवळ चार गोल स्वीकारताना निवृत्त झालेल्या पी. आर. श्रीजेशची उणीव संघाला जाणवू दिलेली नाही.
सध्या जगातील सर्वोत्कृष्ट ड्रॅग फ्लिकर्सपैकी एक असलेल्या हरमनप्रीतने पॅरिसमधील आपला चांगला फॉर्म कायम राखला असून त्याने तब्बल पाच पेनल्टी कॉर्नरचे ऊपांतर गोलमध्ये केले आहे. दरम्यान, दुसऱ्या उपांत्य लढतीत पाकिस्तानचा सामना यजमान चीनशी होणार आहे, तर मंगळवारी अंतिम सामना होणार आहे.