प्रत्येक निवडणुकीत म. ए. समितीचा भगवा फडकवणे काळाची गरज
हलगा गावाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद
वार्ताहर /सांबरा
सीमाभागातील मराठी माणसांना मराठी भाषा अस्मिता टिकवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीशिवाय पर्याय नाही. यामुळे आगामी काळामध्ये सीमाभागातील सर्व मराठी भाषिकांनी महाराष्ट्र एकिकरण समिती बळकट करून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत म. ए. समितीचा भगवा झेंडा फडकवणे काळाची गरज आहे. यासाठी आपण तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याला समितीच्या भगवा झेंड्याकडे एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करूया, असे उद्गार हलगा समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णासाहेब घोरपडे यांनी काढले. म. ए. समितीच्या संपर्क दौऱ्यानिमित्त हालगा गावामध्ये समितीच्या नेतेमंडळींनी माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शुक्रवारी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी गावातील प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच झालेल्या बैठकीमध्ये अॅड. अण्णासाहेब घोरपडे यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबुराव धामणेकर यांनीही समितीशिवाय मराठी माणसाला पर्याय नाही. मराठी भाषिकांवर होणारे अन्याय-अत्याचार थांबवण्यासाठी, या भागातील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी म. ए. समिती मजबूत करणे काळाची गरज आहे. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा झेंडा फडकवणे ही काळाची गरज आहे, असे विचार व्यक्त केले
यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, आम्ही गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील प्रत्येक गावी जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. त्यामुळे आम्हाला या संपर्क दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांकडून चांगले विचार मिळत असून आगामी काळात संघटना बळकट करून तालुक्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण करणार आहे. या संपर्क दौऱ्यामध्ये माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर, माजी तालुका पंचायत अध्यक्ष लक्ष्मण होनगेकर, माजी कृषी उत्पन्न समितीचे सदस्य मोनाप्पा पाटील, अनिल पाटील, मनोहर संताजी, मनोहर हुंद्रे, मनोहर संताजी, यल्लाप्पा रेमानाचे आदी उपस्थित होते. हलगा गावातील म. ए. समितीचे कार्यकर्ते अॅड अण्णासाहेब घोरपडे, बाबुराव धामणेकर, प्रकाश हेब्बाजी, शेखर हनमंताचे, अॅड. अनंत घोरपडे, नवनाथ कामानाचे, नितीन तहसीलदार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.