बिहारमध्ये इंडिया आघाडीत फूट निश्चित : पशुपती पारस
जेडीयुची रालोआशी जवळीक वाढल्याचाही दावा
वृत्तसंस्था/ पाटणा
भाजप आणि जेडीयू नेत्यांच्या वक्तव्यामुळे बिहारच्या राजकारणात गोंधळाचे वातावरण आहे. याचदरम्यान आता एनडीएचा भाग असलेल्या पशुपती पारस यांनी इंडिया आघाडीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. इंडिया आघाडी तुटणे 100 टक्के निश्चित असून राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर रालोआ अधिक मजबुत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यांच्यातील मतभेद अधिक तीव्र झाल्याचा दावाही केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख पशुपती कुमार पारस यांनी केला.
बिहारमध्ये आरजेडी-जेडीयू-काँग्रेस-डावी आघाडी मजबूत मानली जाते. या मुद्याचा इथे परिणाम होईल का, असा प्रश्न केंद्रीय मंत्र्यांना विचारण्यात आला. यावर पशुपती पारस यांनी लोकसभा निवडणुकीत या सर्वांचा पराभव होईल असे स्पष्ट करतानाच त्यांची युतीही लवकरच तुटेल असे पारस म्हणाले. नितीशकुमार रालोआच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू असतानाच लालूप्रसाद यादव आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शुक्रवारी नितीशकुमार यांची भेट घेऊन इंडिया आघाडीत फूट पडण्याची चर्चा फेटाळून लावली होती.