चीनमधून होणाऱ्या आयातीचे प्रमाण वाढले
21 टक्क्यावरुन आयात 30 टक्के : ग्लोबल ट्रेड रिसर्चची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनमधून होणाऱ्या वस्तुंच्या आयातीचे प्रमाण अलीकडच्या काळामध्ये वाढले असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या 15 वर्षांमध्ये आयातीचे प्रमाण 21 टक्क्यांवरून 30 टक्क्यांवर पोहोचले आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे.
कोणत्या गोष्टींची होतेय आयात
चीनमधून होणाऱ्या वस्तूंची आयात वाढत असून त्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. भारत सरकार आणि उद्योग मंत्रालयाने याबाबत विचार करायला हवा, अशा प्रकारचा सूर आळवला जात आहे. टेलिकॉम, मशिनरी आणि इलेक्ट्रॉनिक्स याक्षेत्राशी संबंधीत घटक, वस्तुंकरीता बऱ्याचअंशी भारत चीनवर अवलंबून आहे. खरंतर हे अवलंबित्व हळुहळू कमी व्हायला हवं, असे अनेकांचे म्हणणे आहे.
निर्यातीपेक्षा आयात जास्त
संबंधीत वस्तुंच्या आयातीमध्ये गेल्या पंधरा वर्षांमध्ये 30 टक्के इतकी वाढ झाली आहे. याआधी हे प्रमाण 21 टक्के इतके राहिले होते. 2019 ते 2024 या काळामध्ये भारताने चीनला 16 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात केली आहे पण या तुलनेमध्ये आयातीचा विचार करता 70.3 अब्ज डॉलर्सची आयात करण्यात आली आहे. ही 70 अब्ज डॉलर्सची आयात 2018-19 मध्ये नोंदली गेली होती.
चीन 2.3 पट वेगाने करतोय निर्यात
सध्यालाही आयात 2023-24 मध्ये 101 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. एकाच देशावर आयातीसाठी अवलंबून राहण्याऐवजी भारताने आता इतर पर्यायी देशांचा विचार करायला हवा, अशा प्रकारचा सूर व्यक्त होताना दिसत आहे. भारताला चीन 2.3 पट वेगाने आपल्या वस्तूंची निर्यात करताना दिसत आहे. 2023-24 मध्ये भारताने 677 अब्ज डॉलर्सची आयात केली असून यामध्ये 101 अब्ज डॉलरचा वाटा हा एकट्या चीनचा आहे.