नदीवरील बांध खोदाई तातडीने थांबवा
तालुका पंचायत अधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायतीतर्फे रोजगार हमी कामगारांसाठी नदीतील गाळ काढण्याचे काम देण्यात आले आहे. मात्र नदीत पाणी असल्याने सदर कामगारांकडून नदीवरील बांध खोदाई करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून सदर काम त्वरित बंद करण्यात यावे, अशी मागणी अलतगा ग्रामस्थांतर्फे ता. पं. कार्यकारी अधिकारी रामरे•ाr पाटील यांच्याकडे करण्यात आली. रोजगार हमी योजनेंतर्गत कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायतीकडून मार्कंडेय नदीवर काम देण्यात आले आहे. सध्या नदीपात्रात पाणी असल्याने नदीतील गाळ काढणे अशक्य आहे. त्यामुळे कामगारांकडून नदीकाठावरील जमिनीमध्ये खोदाई करण्यात येत आहे. परिणामी कामगारांकडून केल्या जाणाऱ्या खोदकामामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांना फटका बसत आहे. या खोदकामामुळे जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान होत आहे. हे काम बेकायदेशीर असून त्वरित बंद करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ तालुका पंचायत अभियंत्यांना बोलावून माहिती दिली. दरम्यान, अधिकाऱ्यांनी चूक मान्य करून नुकसान होवू देणार नाही. नियोजित काम बंद करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी ग्रा. पं. सदस्य चेतक कांबळे, देवस्थान पंच कमिटी अध्यक्ष चंद्रकांत धुडूम, कल्लाप्पा चौगुले, अनिल पावशे, उमेश चौगुले, शिवाजी पावशे, सिद्राय दळवी, सोमनाथ आलोजी, परशराम चिखलकर, रुपेश चौगुले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.