Maharashtra Monsoon update राज्यात पुढील 48 तास अतिवृष्टीचे, नाशिक -त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीची शक्यता, मुख्यमंत्री फडणविसांची माहिती
प्रतिनिधी, मुंबई : राज्यात येत्या 8 जुलैपर्यंत विविध भागात अतिवफष्टी होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारचा अलर्ट हा नाशिकसाठी आहे. तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्यामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या मधल्या भागात ढगफुटीमुळे 300 मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत महिन्याभराच्या सरासरीचा पाऊस केवळ चार दिवसांत झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली.
राज्यात सुरू असलेल्या अतिवफष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस 8 जुलैपर्यंत सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर आवश्यक भागात एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्याची माहिती मुख्यमंर्त्यांनी दिली. पालघर, वसई-विरार, रायगड, सातारा, कोल्हापूर आदी परिसरात मोठया प्रमाणात अतिवफष्टी झाली आहे. या सर्व परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग 24 तास कार्यरत आहे. अगदी गावपातळीपर्यंत लक्ष देण्यात येत असल्याचे फडणवीस म्हणाले.
अतिवृष्टीचा पालघर जिह्याला तडाखा बसला असून गुजरातमधून येणाऱ्या रेल्वे गाड्यात अडकलेल्या प्रवाशांना रस्ते मार्गे काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. रायगडमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पण शहरांत पाणी शिरलेले नाही. चार नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सातारा घाटाच्या भागात अतिवफष्टी झाली आहे. कोल्हापूरमध्येही पाण्याची वाटचाल धोक्याच्या पातळीकडे चालली आहे. तिथे पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई -पुणे महामार्गावर 100 टनांचा ढिगारा
मुंबई -पुणे महामार्गावर दरड कोसळल्याने 100 टन ढिगारा जमा झाला होता. आतापर्यंत 70 टन ढिगारा काढून टाकण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले स्वत: तिथे जाऊन लक्ष ठेवून आहेत. यापूर्वी इतक्या मोठया प्रमाणात तिथे ढिगारा कधीच जमा झाला नव्हता. ढिगाऱ्यात अडकलेल्या चारचाकी वाहनांना काढण्याचे काम सुरू आहे. रेल्वेनेही वेगाने कारवाई सुरू करून सेवा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे फडणवीस म्हणाले.
वारकऱ्यांनी पुण्यातच जमावे
सध्या वारी सुरू असून इंद्रायणीवरचे चारही पूल पाण्याखाली चालले आहेत. 10 तारखेला पुण्यात वारी येणार आहे. पण या स्थितीमुळे वारकऱ्यांनी देहू-आळंदीला जमा न होता पुण्यात यावे, असे आवाहन करत वारीसाठी जर्मन हँगरच्या माध्यमातून वारकऱ्यांची व्यवस्था केली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.