गुरांची अवैध वाहतूक; दोघांच्या मुसक्या आवळल्या
राजापूर :
तालुक्यातील पाचल येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने सापळा रचून अवैध मार्गाने गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत 13 जनावरांसह सुमारे 12 लाख ऊपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात गोवंश वाहतूक आणि कत्तलींना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक सोमवारी लांजा उपविभागात गस्त घालत होते. यावेळी त्यांना राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाचल ते जवळेथर रोडने गगनबावडा घाटमार्गे अवैध गोवंश वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने पाचल येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. यावेळी एमएच 08 एपी 0254 क्रमांकाच्या गाडीच्या हौद्यामध्ये अत्यंत दाटीवाटीने दोरीने बांधलेली एकूण 13 गोवंश जनावरे आढळून आली. या जनावरांना पाणी आणि चारा न देता वेदना होतील अशा अवस्थेत त्यांची कत्तलीसाठी वाहतूक केली जात होती. पोलिसांनी चालकाकडे चौकशी केली असता त्याच्याकडे गोवंश वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा पशु वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र नसल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी पोलिसांनी सलमान मुस्ताक बलबले (35, रा. बलबले मोहल्ला, राजापूर) आणि संजय दत्तराम पाटणकर (48, रा. कुंभवडे रामणवाडी, राजापूर) यांना ताब्यात घेतले असून चौकशीत त्यांनी ही जनावरे तळगाव कोंडे येथील मोहम्मद उर्फ पांड्या काजी यांच्याकडून आणल्याचे सांगितले. याप्रकरणी तिन्ही आरोपींविऊद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, मोटार वाहन कायदा आणि भारतीय न्याय संहिता 2023 च्या विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी 13 गोवंश गुरांची सुटका केली असून संशयितांकडून एक वाहन आणि इतर मुद्देमाल मिळून एकूण 12 लाख 5 हजार ऊपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष भागणे, हवालदार नितीन डोमणे, पालकर, कदम आणि प्रवीण खांबे यांनी ही कारवाई केली.