बेकायदा वाळू उपशामुळे मलप्रभा नदी-नाल्यांचे पाणी गढूळ
पर्यावरणासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्यावरही परिणाम : रोगराईचा वाढता धोका
खानापूर : मलप्रभा नदीला मिळणाऱ्या हलात्रीसह इतर नाल्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याने मलप्रभा नदीचे पाणी गढूळ होऊन दूषित झाले आहे. त्याचा परिणाम पर्यावरणावर तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्यावरही होत आहे. या पाण्यामुळे अनेक रोगराई निर्माण होत आहे. नुकताच पाऊस थांबला आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. अशातच वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने वाळू उपशामुळे हलात्री नदीसह इतर नाल्यांचे गढूळ पाणी मिसळल्याने मलप्रभेचे पाणी पूर्णपणे गढूळ झाले आहे.
सध्या वाळू उपशावर शासनाचा निर्बंध आहे. मात्र अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याची चर्चा सामान्य नागरिकांतून होत आहे. नाल्यातून मोठ्याप्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याने मलप्रभा नदीचे पाणी गढूळ झाले आहे. हे पाणी खानापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वापरण्यात येते. हे पाणी खानापूर शहरवासियांना शुद्ध, स्वच्छ करून सोडले जात असले तरी त्याच्यात मिसळणारी मळही आरोग्यास अपायकारक असल्याचे दिसून येत आहे. मात्र याबाबत महसूल विभागाकडून तसेच नगर पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्याने शहरवासियांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधित विभागाने बंदी घालावी
शासनाकडून वाळू उपशावर निर्बंध घालण्यात आले असले तरी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे निसर्गावर परिणाम होत आहे. मलप्रभेच्या पात्रात गेल्या काही दिवसांपासून वाळू उपशामुळे मळमिश्रित पाणी सोडल्याने मलप्रभेचे पात्रही दूषित झाले आहे. याचा परिणाम दिसून येत आहे. मणतुर्गा, शेडेगाळी, खानापूरसह इतर गावातील मलप्रभेच्या पात्रात मिसळणाऱ्या या गढूळ पाण्यामुळे संपूर्ण नदीपात्रच गढूळ झाले आहे. यासाठी संबंधित खात्याने गांभीर्याने अवैध वाळू उपशावर तातडीने बंदी आणावी, अशी मागणी होत आहे.