Satara News | सह्याद्री सहकारी साखर कारखाना कडून ऊस बिलात बेकायदेशीर कपात; शेतकऱ्यांचा आरोप
सातारा कलेक्टर कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोठा ठिय्या आंदोलन
सातारा : सह्याद्री सहकारी साखर कारखाना यांच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलामधून बेकायदेशीर कपात पुन्हा सुरू करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत राष्ट्रीय काँग्रेस किसान सेलचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष वसीम इनामदार यांनी निवेदनाद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सेक्शन ४८ (अ) नुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून सेवा सोसायटीमार्फत कोणताही कर अथवा कपात करता येत नसतानाही कारखान्याकडून सर्रासपणे कपात केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “कायद्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी फक्त शेतकऱ्यांचीच आहे का? साखर कारखानदारांकडून उघडपणे कायदा मोडला जात असताना त्यांच्यावर कारवाई का होत नाही?” असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
ऊस बिलातून कपात केलेली रक्कम त्वरित परत करावी व बेकायदेशीर कपात तात्काळ थांबवावी, अन्यथा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सातारा जिल्हा किसान सेलच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही स्पष्ट करण्यात आले. या वेळी सुषमा राजेघोरपडे, आनंद जाधव, सादिकभाई बागवान आदी शेतकरी उपस्थित होते.