आमटेतील नळपाणीपुरवठा योजनेच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष
ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात : नैसर्गिक स्त्राsताद्वारे पाण्याचा पुरवठा : ग्रा. पं.च्या दुर्लक्षामुळे गत वर्षापासून अशुद्ध पाणीपुरवठा
वार्ताहर /जांबोटी
आमटे ग्राम पंचायतीच्या दुर्लक्षामुळे गावातील नागरिकांना अशुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असून दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तरी गावाला स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. सुमारे 3000 लोकसंख्या असलेल्या आमटे गावासाठी गेल्या चार वर्षापासून जलनिर्माण योजनेअंतर्गत नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच गेल्या अनेक वर्षापासून गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या नैसर्गिक स्त्राsताद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. गावासाठी दोन नळपाणी योजना कार्यान्वित असल्या तरी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना गेल्या वर्षापासून अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
मृत पक्षी-मलमूत्रामुळे पाणी दूषित
नैसर्गिक पाणीपुरवठ्याचा स्त्राsत खासगी शेतवडीत आहे. मात्र या ठिकाणी ग्रामपंचायतीने गावाला स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने कोणतीच उपाययोजना केली नसल्यामुळे या ठिकाणी गावातील पाळीव जनावरे तसेच जंगलातील पशुपक्षी देखील पिण्यासाठी याच पाण्याचा वापर करतात. त्यामुळे या ठिकाणी जनावरांचे मलमूत्र पाण्यात मिसळत असल्याने पाणी दूषित बनत आहे. तसेच मृत झालेले पक्षीदेखील पाण्यात पडून व जनावरे पाण्यातच वावरत असल्यामुळे उन्हाळ्dयाच्या दिवसात पाण्याचा निचरा योग्यप्रकारे होत नाही. त्यामुळे सदर पाणी गढूळ व दूषित बनत आहे.
जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित नसल्याने समस्या
शिवाय गावासाठी कोणतीच जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली नसल्यामुळे नैसर्गिक स्रोतातुन थेट जलवाहिन्यांद्वारे येणाऱ्या पाण्याचा वापर नागरिकांना पिण्यासाठी करावा लागत असल्यामुळे दिवसेंदिवस आरोग्यांच्या समस्या निर्माण होत आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याची साठवणूक करण्यात येणाऱ्या जलकुंभांना झाकणे देखील नसल्यामुळे जलकुंभामध्ये पक्षी मरून पडण्याच्या घटना घडत आहेत. मात्र त्याकडे आमटे ग्रा. पं.चे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
उघड्यावरील जलकुंभांना झाकणे बसवून स्वच्छता राखणे आवश्यक
वास्तविक पाहता ग्रामपंचायतीने गावासाठी पाणीपुरवठा होणाऱ्या जलस्रोतांच्या ठिकाणी संरक्षण कुंपण घालून तसेच फुटलेल्या जलवाहिन्या त्वरित दुरुस्त करून गावातील उघड्यावरील जलकुंभांना झाकणे बसवून स्वच्छता राखण्याची गरज आहे. गावाला शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा या संदर्भात आमटे ग्रामस्थांच्यावतीने खानापूर तालुका पंचायतीला निवेदन देखील देण्यात आले आहे. तरी आमटे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालून गावाला स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.