2 पत्नी असतील तर 2 लाख मिळतील !
ज्या पुरुषांना दोन पत्नी असतील त्यांना काँग्रेसच्या जाहीरनाम्यानुसार 2 लाख रुपये दिले जातील, असे आश्वासन काँग्रेसचे उमेदवार कांतिलाल भुरीया यांनी दिले आहे. ते या पक्षाचे मध्यप्रदेशातील रतलाम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत. काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात प्रत्येक गरीब महिलेला दरवर्षी 1 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासंबंधी ते बोलत होते.
एखाद्या पुरुषाला दोन पत्नी असतील तर आपल्या पक्षाच्या आश्वासनानुसार किती पेसे दिले जातील, असा प्रश्न त्यांना एका चर्चासत्रात विचारण्यात आला होता. त्याला त्यांनी असे उत्तर दिले. त्यांनी हेच विधान एका प्रचारसभेतही केले आहे. या जाहीर सभेत काँग्रेसचे मध्यप्रदेश प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी आणि राजगढ येथील उमेदवार दिग्विजयसिंग हे देखील या जाहीर सभेत व्यासपीठावर होते.
भाजपची तीव्र प्रतिक्रिया
काँग्रेसला पराभव समोर दिसत आल्याने त्या पक्षाच्या नेत्यांचा आणि उमेदवारांचा तोल सुटला आहे. अशी विधाने करुन ते बहुपत्नीत्वाला प्रोत्साहन देत आहेत. या विधानामुळे काँग्रेस पक्षाची घातक आणि हलकी विचारसरणी लोकांसमोर येत आहे. लोक अशा पक्षाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नरेंद्र सलूजा यांनी व्यक्त केली. येथे 13 मे या दिवशी मतदान होणार आहे. भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघात राज्याचे वनविकास मंत्री नागरसिंग चौहान यांच्या पत्नी अनिता चौहान यांना उमेदवारी दिलेली आहे.