सत्तेत आल्यास ‘संपत्ती’चा सर्व्हे करणार
जातीय जनगणनेनंतर राहुल गांधींचे नवे निवडणूक आश्वासन : तेलंगणातील प्रचारसभेत घोषणा
वृत्तसंस्था/ हैदराबाद
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पक्षाने जाहीरनाम्यात अनेक लोकोपयोगी आश्वासने दिली आहेत. त्याचबरोबरच आता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि वायनाडचे लोकसभा उमेदवार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोठे आश्वासन दिले आहे. हैदराबादमध्ये एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी पक्ष सत्तेवर आल्यास जातगणना व्यतिरिक्त मालमत्ता वाटपाचे सर्वेक्षणही करेल. देशातील बहुतांश संपत्ती कोणाच्या मालकीची आहे हे शोधण्यासाठी पक्ष आर्थिक आणि संस्थात्मक सर्वेक्षण करेल. हे आमचे वचन आहे, अशी मोठी घोषणा केली.
तेलंगणातील एका प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘जितनी आबादी उतना हक’ या पक्षाच्या घोषणेचा संदर्भ देत संपत्तीतील असमानतेबाबत भाष्य केले. ‘आम्ही प्रथम देशव्यापी जात जनगणना करणार आहोत, ज्यामध्ये किती लोक कोणत्या श्रेणीत येतात. यामध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी), अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि अल्पसंख्याक समुदायांचा समावेश असेल. यानंतर, आम्ही मालमत्ता/संपत्तीचे समान वितरण सुनिश्चित करण्यासाठी आर्थिक आणि संस्थात्मक सर्वेक्षण करू. जेणेकरून मालमत्तेच्या वितरणाची माहिती मिळू शकेल. काँग्रेस जनतेला त्यांचा न्याय्य वाटा मिळेल याची काळजी घेईल, असे असे राहुल गांधी म्हणाले.
देशातील एकूण लोकसंख्येपैकी मोठी संख्या ही एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याक वर्गाची आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजही या वर्गातील लोक नोकरी करताना दिसत नाहीत. आजही 90 टक्के लोकसंख्येकडे कोणताही हिस्सा नाही. देशाचे प्रशासन चालवणाऱ्या 90 आयएएस अधिकाऱ्यांमध्ये फक्त 3 ओबीसी, 1 आदिवासी आणि 3 दलित आहेत. देशातील संपत्ती, नोकऱ्या आणि इतर लोककल्याणकारी योजना समाजाच्या लोकसंख्येनुसार वितरित करण्याचे काम काँग्रेस पक्ष करेल, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी रविवारी तेलंगणात ज्याठिकाणी सभेला संबोधित करत होते, त्याचठिकाणी गेल्यावषी सोनिया गांधींनी काँग्रेसच्या 6 हमीभावांची घोषणा केली होती. न्यायाच्या पाच स्तंभांवर लक्ष केंद्रित करत काँग्रेसने शुक्रवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. आपल्या जाहीरनाम्यात पक्षाने देशात ओबीसींचे प्रतिनिधित्व मजबूत करण्यासाठी जात जनगणना आणि इतर उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केले आहे. तेलंगणातील लोकसभेच्या 17 जागांसाठी 13 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे.