For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सत्तेवर आल्यास अग्निपथ योजना रद्द करू

06:50 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
सत्तेवर आल्यास अग्निपथ योजना रद्द करू
Advertisement

काँग्रेस पक्षाची घोषणा : अग्निपथ योजनेमुळे युवांच्या स्वप्नांचा भंग

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. सैन्याच्या नियमित सेवेत निवड होऊन भरती न झालेल्या सुमारे 2 लाख युवक-युवतींसोबत न्याय केला जावा, अशी विनंती खर्गे यांनी पत्राद्वार केली आहे. केंद्र सरकारने अग्निपथ योजना आणल्याने या युवांना समस्येला सामोरे जावे लागत असल्याचा दावा खर्गे यांनी केला आहे. तसेच काँग्रेस सत्तेवर आल्यास अग्निपथ योजना रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे.

Advertisement

2019-22 दरम्यान सुमारे 2 लाख उमेदवारांना तीन सशस्त्र दलांसाठी निवड करण्यात आल्याचे कळविण्यात आले होते. या युवांनी अवघड मानसिक आणि शारीरिक चाचणी तसेच लेखी परीक्षेत यश मिळविण्यासाठी संघर्ष केला होता, असे खर्गे यांनी पत्रात नमूद केले आहे.

31 मे 2022 रोजी भारत सरकारने नियमित भरती प्रक्रिया समाप्त करत त्याच्या जागी अग्निपथ योजना लागू केल्याने या युवांच्या स्वप्नांना धक्का पोहोचला. अग्निपथ योजनेसोबत अनेक मुद्दे जोडलेले आहेत. ही योजना सैनिकांना समांतर कॅडर तयार करून आमच्या जवानांदरम्यान भेदभाव निर्माण करणारी ठरणार आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर बहुतांश अग्निवीरांवर नोकरी शोधण्याची वेळ येणार आहे. यामुळे सामाजिक स्थैर्य प्रभावित होऊ शकते, असे खर्गे यांनी पत्रात नमूद केले आहे.

हताश अन् निराश झाल्याने अनेक युवांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. आमच्या युवांना अशाप्रकारचे दु:ख सहन करण्यासाठी वाऱ्यावर सोडले जाऊ शकत नाही. याप्रकरणी न्याय व्हावा, असे खर्गे यांनी राष्ट्रपतींना उद्देशून पत्रात म्हटले आहे.

काँग्रेस केंद्रात सत्तेवर आल्यास अग्निपथ योजना रद्द करत जुनी भरती योजना लागू करण्यात येईल. अग्निपथ योजनेवरून कुठलीच मागणी नव्हती. या योजनेमुळे सैन्याला कुठलाच लाभ होणार नाही, केवळ सरकारचे काही पैसे वाचतील. सशस्त्र दलांना आधुनिक करण्यासाठी काही बदल केले जाऊ शकत होते, परंतु जुनी व्यवस्था पूर्णपणे संपविणे योग्य नाही, अशी भूमिका काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेत मांडली आहे.

Advertisement
Tags :

.