Raju Shetti : तोडगा नाही झाला तर...! – राजू शेट्टींचा इशारा
स्वाभिमानी शेतकरी संघटना: ऊस दरावरील निषेध उग्र होणार
कोल्हापूर : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय कारखानदार एकत्रित येऊन टनाला ३,४०० ते ३,४५० रूपयांपर्यंत पहिली उचल देत आहेत. ही उचल मान्य नसून ऊस परिषदेत केलेल्या ३,७५१ रूपयाबाबत तोडगा नाही झाला तर कार्यकर्त्यांना भूमिगत होऊन आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचे आदेश स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी दिले.
शेट्टी म्हणाले, सांगली, कोल्हापूर व कर्नाटक सीमाभागात ऊस आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. राज्य सरकारने साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांच्यासोबत मध्यस्थी करून गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी तोडगा काढावा, अशी अपेक्षा होती. मात्र राज्य सरकार व कारखानदार याकडे दुर्लक्ष करत आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांनी एफ. आर. पी. जाहीर केली आहे.
त्यामुळे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी सर्व शेतकरी संघटना, कारखानदार आणि प्रशासनाची बैठक घेऊन मार्ग काढण्याचे मागणी त्यांनी केली. गतवर्षी कारखान्यांनी साखरेसह उपपदार्थातून चांगले पैसे मिळवले आहेत. यावर्षीसुध्दा साखर, इथेनॉल, मोलॅसिस, बगॅस या उपपदार्थांना चांगला दर मिळत आहे. काटामारी, रिकव्हरी चोरीतून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. हंगामाच्या सुरवातीस संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊसाला चांगला भाव पाहिजे असल्यास संघटित होऊन आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल, असे त्यांनी सांगितले.
शुक्रवारी आंदोलनाची पुढची दिशा
प्रशासन व राज्य सरकारने तातडीने तोडगा नाही काढला तर मुख्यमंत्री ५ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभुमीवर कार्यकर्त्यांनी भूमिगत होऊन आंदोलनाची तयारी करावी. ७ रोजी निगवे (ता. करवीर) येथून पुढील आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे.