पाणी आडविल्यास हल्ला करु
वृत्तसंस्था / कराची
भारताने सिंधू नदीचे पाणी आडविल्यास भारताच्या धरणांवर हल्ला केला जाईल, अशी धमकी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी दिली आहे. भारताने सिंधू नदीचे पाणी अडविल्यास पाकिस्तानची स्थिती दयनीय होणार आहे. याच पाण्यावर पाकिस्तानची 90 टक्के शेती आणि 80 टक्के उद्योग अवलंबून आहेत. त्यामुळे सिंधू नदी ही पाकिस्तानची जीवनरेखा आहे, असे मानले जाते.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलवितरण करार स्थगित केला आहे. तसेच या कराराच्या माध्यमातून पाकिस्तानच्या वाट्याला आलेल्या सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांचे पाणी आम्ही आडवू, अशी घोषणा केली आहे. ही घोषणा लागू करण्यासाठी भारताने एक त्रिस्तरीय योजनाही साकारली असून या नद्यांचे सर्व पाणी भारतासाठी उपयोगात आणण्याची व्यवस्था करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे चिंतित झालेल्या पाकिस्तानने भारताला धमक्या देण्यास प्रारंभ केला आहे.
बांधकामे उध्वस्त करणार
या नद्यांचे पाणी आडविण्यासाठी भारताने धरणे बांधल्यास किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे बांधकाम केल्यास ते उध्वस्त करण्यात येईल. अशी असीफ यांची धमकी आहे. तथापि, भारताने या धमकीला भीक न घालता आपल्या योजनेचे कार्यान्वयन पुढे चालविले असल्याची माहिती देण्यात आली आहे.