भाजप सत्तेत आल्यास सक्तीची धर्मांतरे रोखणार
छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळाल्यास सक्तीच्या आणि फसवून केलेल्या धर्मांतरांना रोखले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी केले आहे. ते राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचारात सरगुजा येथे जाहीर सभेत बोलत होते. राज्यातील काँग्रेसचे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून जनता या सरकारला कंटाळली आहे, असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे सरकार भ्रष्ट आणि अकार्यक्षम आहे. हजारो कोटी रुपयांचा महादेव अॅप घोटाळा याच सरकारच्या संरक्षणाखाली घडला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडून 500 कोटी रुपयांची लाच घेतली असे या घोटाळ्यातील आरोपीने स्पष्टपणे टीव्हीवर मान्य केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे.
महादेव अॅप घोटाळ्यात सर्वसामान्य जनतेचेच शेकडो कोटी रुपये लुबाडण्यात आले आहेत. भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यास या घोटाळ्यातील आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल. लोकांनी भाजपलाच सत्तेत आणावे, असे आवाहनही राजनाथसिंग यांनी केले.
खरा विकास भाजपच्या काळातच
छत्तीसगड राज्याचा खरा विकास भाजपच्याच काळात झाला होता. भाजपच्या सलग 15 वर्षांच्या शासनकाळात राज्याच्या वनवासी बहुल भागातही मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली होती, याची मतदारांना जाणीव आहे. शिवाय गरीबांसाठी विनामूल्य धान्य देण्याची योजना मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होती. तथापि, काँग्रेसचे सरकार आल्यानंतर विकासापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य देण्यात आले. परिणामी विकास ठप्प झाला असून त्याला गती देणे काँग्रेसला शक्य नाही. जनता यावेळी भाजपचेच सरकार आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.