Ichalkaranji news | इचलकरंजीत कायद्याचा 'बसू' बसणार वचक! चुकीचे वागणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत
इचलकरंजीत कायद्याचा धाक वाढवणार
इचलकरंजी : प्रत्येकाने कायद्याच्या चौकटीत राहून वागणे आवश्यक असून, कायद्याचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून कायद्याचा धाक कायम ठेवला जाईल, अशी स्पष्ट भूमिका नूतन पोलिस अधीक्षक निलोत्पल बसू यांनी मांडली.
गावभाग पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. बसू यांनी आपल्या पूर्वानुभवाचा उल्लेख करत सांगितले की, मालेगाव येथे काम करताना अनेक आव्हानांचा सामना केला असून त्या अनुभवाचा येथे निश्चितच उपयोग होईल. मालेगाव आणि नाशिक यांच्यात केवळ १०० किलोमीटर अंतर असले तरी विकासाच्या बाबतीत मोठी दरीदिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे कायद्याचा अभाव. जिथे कायद्याचा धाक नाही, तिथे विकास खुंटतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
कायदा सर्वांसाठी समान आहे. नागरिकांनीही नियमांचे पालन करणे, ही जबाबदारी समजून वागले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. जनतेच्या हितासाठी कामकरताना पोलिस आणि नागरिक यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण करणे ही प्राथमिकता राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस प्रशासन अधिक सक्षम आणि उत्तरदायी बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपअधीक्षक विक्रांत गायकवाड आणि पोलीस निरीक्षक महेश चव्हाण उपस्थित होते.