खर्गे मुख्यमंत्री बनले तर मला अत्यानंद होईल : डॉ. परमेश्वर
बेंगळूर : राज्य काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री बदलावरून दोन गटांत रस्सीखेच सुरू आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या समर्थकांकडून उघडपणे वक्तव्ये होत असतानाच त्यात आता गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांची भर पडली आहे. एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे मुख्यमंत्री बनले तर मला अत्यानंद होईल. खर्गे हे खूप अनुभवी नेते आहेत, असे त्यांनी सांगितले. याद्वारे परमेश्वर यांनी दलित मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्याला अप्रत्यक्षपणे हात घातला आहे. बुधवारी बेंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री बदलाबाबत मला कोणतीही माहिती नाही.
या विषयावर आता भाष्य करणे योग्य नाही. मल्लिकार्जुन खर्गे यांना राज्यातील सर्व समस्यांची माहिती आहे. ते एआयसीसीचे अध्यक्ष आहेत. त्यांना राज्याच्या राजकारणाची इत्यंभूत माहिती आहे. त्यांच्याकडे राजकारणाचा पुरेसा अनुभव आहे, डॉ. परमेश्वर म्हणाले. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि काही मंत्र्यांनी दिल्ली दौरा करून खर्गेंशी चर्चा केली आहे, असा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला असता ते म्हणाले, शिवकुमार संरक्षणमंत्र्यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते. तर मंत्री सतीश जारकीहोळी आणि एच. सी. महादेवप्पा हे राष्ट्रीय अनुसूचित आयोगाला राज्यातील अंतर्गत आरक्षणासंबंधी माहिती देण्यासाठी दिल्लीला गेले होते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.