पंतप्रधान मोदी यांच्या सूचनांचे स्वागत करतो
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे प्रतिपादन
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची आर्थिक परिस्थिती बिघडू नये, ती मजबूत व्हावी या उद्देशाने ज्या काही सूचना मांडलेल्या आहेत, त्यांचे आपण स्वागत करतो, असे प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी म्हटले आहे.पत्रकारांशी बोलताना दामू नाईक म्हणाले की आपला देश प्रचंड प्रमाणात सोन्याची आयात करतो आणि त्यावर अब्जावधी डॉलर खर्च करीत असतो, सोन्याचा वापर थोडा कमी केला तर आपले चलन थोडे वाचण्याची शक्यता जास्त आहे. याशिवाय पेट्रोलवरील खर्च वाढता कामा नये. कमीत कमी पेट्रोलचा वापर व्हावा, या उद्देशाने होईल तेवढ्या पद्धतीने घरून काम करता येईल ते पहावे. विमान प्रवास देखील जास्त वाढता कामा नये, याची दखल आपण घेतली पाहिजे.
जागतिक पातळीवर युद्धाचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. सर्वच राष्ट्रांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे आपण वेळीच काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे नाईक म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच देशाची चिंता करीत असतात. देशातील नागरिक सुखी व्हावे यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. कोविडच्या काळातली परिस्थिती फार संयमशीलपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाताळलेली आहे. त्यांच्यासमोर दूरदृष्टीकोन असल्यामुळेच त्यांनी जनतेला सावध केले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनी इंधनाचा कमीत कमी वापर करणे गरजेचे आहे. म्हणूनच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणांचे आणि प्रस्तावाचे स्वागत करतो, असे दामू नाईक पुढे म्हणाले.