बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मीच आहे
मुख्यमंत्री सिद्धरामय्या : काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन : यरगट्टी येथे प्रजाध्वनी-2 प्रचारसभा
बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मीच आहे. येथे काँग्रेस पक्षाला सर्वाधिक मताधिक्याने विजयी करा. हुबळी येथे पराभूत झालेल्या जगदीश शेट्टर यांना बेळगावमध्येही पराभूत करून परत पाठवा, असे आवाहन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ यरगट्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रजाध्वनी-2 कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे उद्घाटन करून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, बेळगाव लोकसभा मतदारसंघातून सिद्धरामय्याच निवडणुकीला उभे आहेत, असे समजून मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर मतदारसंघाच्या विकासासाठी परिश्रम घेत आहेत. त्यांचा मुलगा मृणाल हेब्बाळकर लोकसभेसाठी निवडणूक लढवित असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना विजयी करा, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगावला येऊन खोटी आश्वासने देऊन खोटे बोलून गेले आहेत. राज्याच्या दौऱ्यावर आले असता नेहमीच त्यांच्याकडून खोटे बोलले जाते. अशी खोटी आश्वासने देऊन खोटे बोलणाऱ्यांवर मतदारांनी विश्वास ठेवू नये. दहा वर्षांपासून केवळ खोटेच सांगितले जात आहे, असे सांगत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजपकडून गॅरंटी योजनांबाबत खोटी माहिती सांगितली जात आहे. योजना बंद होणार असल्याचा अपप्रचार केला जात आहे. पाच वर्षांपर्यंत कोणत्याही कारणास्तव गॅरंटी योजना बंद केल्या जाणार नाहीत. पुढील वर्षासाठी आवश्यक असणारा निधी आताच उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी केपीसीसी अध्यक्ष उपमुख्यमंत्री डी. पे. शिवकुमार, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, मंत्री सतीश जारकीहोळी, भैरती सुरेश, माजी मंत्री विनय कुलकर्णी, जिल्ह्यातील आमदार, नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.