For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बोलण्याची संधी दिली जात नाही!

06:09 AM Feb 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
बोलण्याची संधी दिली जात नाही
Advertisement

राहुल गांधींच्या आरोपावरून लोकसभेत गोंधळ, सभागृह तहकूब

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमधील संघर्ष सुरूच आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत गंभीर आरोप करत आपल्याला सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा होरा कायम धरत सरकारवर दबाव टाकला आहे. सोमवारीही या मुद्द्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात घोषणाबाजी सुरू ठेवल्याने हा मुद्दा पेटला. विरोधी पक्षाचे खासदार ‘राहुल गांधींना बोलण्याची संधी द्या’ असे म्हणत होते. या गोंधळामुळे वारंवार व्यत्यय चालू राहिल्यामुळे अखेर कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब करावे लागले.

Advertisement

राहुल गांधी यांनी सभागृहात आल्यानंतर बोलण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आपण सभापतींची भेट घेऊन बोलण्यास वेळ देण्याची मागणी केली होती. या भेटीत त्यांनी बोलण्याची संधी देण्याचे आश्वासन दिले होते, असे सांगितले. तथापि, सभापती ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांनी कोणत्याही मुद्यावर कोणतीही औपचारिक सूचना दिलेली नाही, असे स्पष्ट केले. याचवेळी सभापतींनी खासदारांना सभागृहाची प्रतिष्ठा राखून अर्थसंकल्पीय चर्चा सुरू ठेवण्याचे आवाहन केले. याप्रसंगी विरोधकांनी लोकसभा सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याचे संकेतही माध्यमांशी बोलताना दिले.

किरेन रिजिजू यांचा पलटवार

राहुल गांधी यांच्या आरोपांना तोंड देण्यासाठी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी पुढाकार घेत त्यांचे दावे फेटाळले. सभागृहातील गतिरोध सोडवण्यासाठी सभापतींनी स्वत: पुढाकार घेतल्याचे रिजिजू यांनी स्पष्ट केले.  विरोधी पक्षनेत्याने सभागृहाच्या नियमांचे पालन न करता केलेले आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित होते. सभागृहाचे कामकाज नियम आणि सूचनांवर आधारित चालते, असे सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

गोंधळामुळे कामकाजात अडथळा

सोमवारी लोकसभेचे कामकाज दोनदा गदारोळामुळे तहकूब झाल्यानंतर दुपारी 2 वाजता पुन्हा सुरू झाले. राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पीय चर्चेपूर्वी बोलावे अशी मागणी विरोधकांनी कायम ठेवल्यामुळे सभागृहात गोंधळ वाढला. संपूर्ण दिवस गोंधळ सुरू राहिल्याने सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवता आले नाही. विरोधी पक्ष त्यांच्या मागण्यांपासून मागे हटण्यास तयार नसल्यामुळे सध्या संसदेत अर्थसंकल्पीय चर्चेवर अनिश्चितता आहे.

Advertisement
Tags :

.