मायेने चित्त मोहित झालेल्या पाप्याला मी प्राप्त होत नाही
अध्याय सहावा
बाप्पा म्हणाले, ईश्वराचे अस्तित्व सगळ्यांच्यात असते. पंचमहाभूतातील वैशिष्ठ्यो तसंच प्राणिमात्रांमध्ये जे चांगले गुण असतात ते त्यांच्यामध्ये असलेल्या ईश्वरी अंशामुळेच असतात. कुणी दिसायला सुंदर असेल, कुणाला गाता गळा लाभला असेल, कुणाला काही कला अवगत असेल, कुणाला काही खेळ उत्तम खेळता येत असतील इत्यादि या सगळ्यातून ईश्वरी अस्तित्व ठळकपणे जाणवतं. अशाप्रकारे प्रत्येकात जी काही वैशिष्ट्यो असतील त्या त्या सर्व ईश्वरी अस्तित्वाच्या खुणा असतात. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती हे तिन्ही विकार ईश्वरी अस्तित्व दर्शवतात. माणसाचे शरीर विकारी असल्याने त्याच्यात इच्छा, द्वेष, सुख, दु:ख हे विकार असतात हे सगळ्यांनाच माहित आहे. बाप्पा म्हणतात, ह्या विकारांच्या जोडीला त्याच्यात जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती हेही विकार असतात. विकारांचा अतिरेक वाईट असला तरी आवश्यकतेनुसार त्यांचा वापर केला तर ते माणसाच्या दैनंदिन जीवनास पोषक ठरतात. ईश्वरी अस्तित्व दर्शवणारे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती हे तीन विकार तर माणसाला वरदान आहेत असे म्हंटले तरी चालेल. जागृतावस्थेत असताना तो त्याचे नित्याचे व्यवहार सुरळीतपणे पार पडू शकतो. त्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा त्याला तो गाढ झोपलेला असताना त्याच्या शरीरात साठवून ठेवलेली असते. ती सुशुप्तावस्था होय. जर झोप मिळाली नाही तर माणूस दिवसभर बेचैन असतो. आज माझी झोप नीट झाली नाही त्यामुळे मला काहीही सुचत नाहीये असे वारंवार म्हणत असतो. काही लोकांना दिवसेंदिवस नीट झोप लागत नाही. त्यांचे हाल तर काही विचारू नका. निद्रानाशाचा हा आजार ज्याला भविष्याची चिंता आणि काळजी सतावत असते त्यांच्या वाटणीला बहुतेककरून येतो. माणूस हा नेहमी आशेवर जगत असतो. आज नाही पण उद्यातरी आपल्याला हवी आहे ती वस्तू मिळेल अशी उमेद तो बाळगून असतो. जागृतावस्थेत मनात तेच विचार सतत करत असल्याने ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ ह्या म्हणीनुसार तो अर्धवट झोपेत असताना स्वप्नावस्थेत ती वस्तू मिळाल्याचे स्वप्न त्याला पडते आणि त्या स्वप्नाच्या आधाराने तो दिवसभर उत्साहाने ध्येयपूर्तीच्या मागे धावत असतो.
ह्याप्रमाणे बाप्पांनी राजाला माणसाच्या दैनंदिन जीवनात अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या आणि त्यातील ईश्वरी अस्तित्व जाणवणाऱ्या गोष्टींचा परिचय करून दिला. असं जरी असलं तरी मनुष्य ईश्वराचे ऋण मान्य करत नाही. त्याच्यात आणि ईश्वरात असलेला मायेचा पडदा त्याला ईश्वराचे दर्शन घडवू शकत नसल्याने ईश्वर त्याला डोळ्यांनी दिसू शकत नाही आणि जी गोष्ट डोळ्यांनी दिसत नाही ती त्याला खरी वाटत नाही. अर्थात ईश्वर ही मानवी डोळ्यांनी दिसणारी गोष्ट नव्हे त्यासाठी ज्ञानचक्षंgची गरज असते हा भाग वेगळा. सर्वसामान्य मनुष्य मायेच्या प्रभावाखाली असल्याने त्याला माझी भेट होत नाही असे बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
न मां विन्दति पापीयान्मायामोहितचेतनऽ ।
त्रिविकारा मोहयति प्रकृतिर्मे जगत्त्रयम् ।।11 ।।
अर्थ- मायेने चित्त मोहित झालेल्या पाप्याला मी प्राप्त होत नाही. तीन विकारांनी युक्त अशी माझी माया त्रैलोक्याला मोह पाडते.
विवरण-माया ही ईश्वराची निर्मिती असून तिच्या सहाय्याने ईश्वराने सृष्टी तयार केली. मनुष्यप्राणी ही ईश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती होय. मनुष्य जन्मात बुद्धीचं अमोघ असं वरदान ईश्वरानं दिलेलं आहे. त्याचबरोबर मनुष्याचं जीवनचक्र कोरडं आणि रसहीन होऊ नये म्हणून मायेचं आवरणही ईश्वरानं घातलेलं आहे. त्यानुसार सत्व, रज, तम हे तिन्ही गुण माणसात असतात आणि प्रसंगानुसार त्यातील एक इतर दोघांपेक्षा वरचढ ठरत असतो.
क्रमश: