जिल्हाधिकारी आवारात पोलीस-शेतकऱ्यांत हायड्रामा
जिल्हा प्रशासनावर मोर्चा : आंदोलन करणाऱ्यांना रोखताना पोलिसांची दमछाक, शेतकरी-पोलिसांत बाचाबाची
बेळगाव : संपूर्ण कर्जमाफीसह घेतलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी येणाऱ्या आर्थिक संस्थांच्या अधिकाऱ्यांना त्वरित थांबविण्यात यावे. या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी विविध शेतकरी संघटनांकडून काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान पोलीस व शेतकऱ्यांमध्ये हायड्रामा झाल्याची घटना मंगळवारी घडली. यामुळे पोलीस व शेतकऱ्यांत वादावादी झाली. शेतकऱ्यांना रोखताना पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिलासा देण्यात आलेला नाही. असे असताना कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांकडे आर्थिक संस्थांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात आहे. बँकांसह फायनान्सकडून कर्जवसुलीसाठी नोटीस दिल्या जात आहेत. फायनान्सकडून वाहने जप्त करण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्ज भरणे अशक्य आहे. तरी देखील आर्थिक संस्थांकडून कर्जवसुलीचा तगादा सुरूच आहे. कर्जवसुली त्वरित थांबविण्यात यावी. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, या मागणीसाठी विविध शेतकरी संघटनांकडून कन्नड साहित्य भवन येथून जिल्हा प्रशासनावर मोर्चा काढण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस फौजफाटा असूनही रणरणत्या उन्हात मोर्चा काढून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखणे अशक्य झाले. यामुळे शेतकरी व पोलिसांत बाचाबाची झाली. यावेळी पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, एसीपी सदाशिव कट्टीमनी, पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमीर्ची यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना रोखण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.