तुडयेतील साखळी उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू
तुडये-बेळगाव बस सुरू करण्याची मागणी
तुडये : बेळगावपासून राकसकोपला येणाऱ्या बसफेऱ्या तुडये गावापर्यंत सोडाव्यात, या मागणीसाठी गुरुवारी सुरू झालेले साखळी उपोषण शुक्रवारीही सुरू होते. 1977 सालापासून तुडये गावी बेळगाव शहर परिवहन मंडळाची (केएसआरटीसी)बससेवा ही कित्तूर चन्नम्मा बसस्थानकातून सुरू करण्यात आली. सर्वात जादा उत्त्पन्न देणारा हा रूट होता. त्यानंतर किल्ला बसस्थानकावरून बस सेवा सुरू होती. तुडये-हाजगोळी व त्यानंतर धामणे (एस.)पर्यंत गाडी सोडण्यात आल्या. प्रवासी संख्याही जादा होती. तुडये येथील सरपंच विलास सुतार यांनी राकसकोपपर्यंत सुरू असलेल्या बसेस तुडये गावापर्यंत सोडाव्यात, अशी मागणी करणारे निवेदन दिले.
मात्र बससेवा देण्यास टाळाटाळ केल्याने सरपंच विलास सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. एक तर बेळगाव डेपोने बससेवा सुरू करावी किंवा चंदगड आगाराने या परिसरात सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या उपोषणात सरपंच विलास सुतार, उपसरपंच अशोक पाटील, पांडुरंग चव्हाण, अशोक मोहिते, हर्षवर्धन कोळसेकर, रामलिंग चांदीलकर, गणपती कोरजकर, प्रमोद गुरव, शिवाजी पाटील, प्रा. बाळू कनगुटकर, प्रा. रमेश दळवी, यल्लाप्पा सुतार, महादेव नार्वेकर, रामलिंग बसरीकट्टी, बाबू पाटील, मारुती पाटील, गुंडू कलजी यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग घेतला.