आरवली येथे महाराजस्व अभियानास उस्फुर्त प्रतिसाद
वेंगुर्ले (वार्ताहर)-
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान हे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध स्वरूपाची कामे जलदगतीने होतात. त्यामुळे नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयवंत राय यांनी केले.शिरोडा मंडळात श्रीदेव वेतोबा मंदिराच्या अन्नशांती सभागृहात गुरुवार दि. २४ रोजी आयोजित केलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान नागरिकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांत अध्यक्षस्थानी आरवली श्रीदेव वेतोबा देवस्थानचे अध्यक्ष जयवंत राय, शिरोडा मंडळ अधिकारी निलेश मयेकर, रेडी तलाठी सुवणी साळुंखे, आरवली तलाठी सतीश गावडे, आरवलीचे माजी सरपंच तथ सामाजिक कार्यकर्ते मयूर आरोलकर, बबन बागकर, सावळाराम उर्फ आबा टांककर, पोलीस पाटील मधुसुदन मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य समृध्दी कुडव आदींचा समावेश होता.श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानात संजय गांधी निराधार योजनेची ८ प्रकरणे मंजूर केली, १० नवीन रेशनकार्ड धारकांना वितरीत केली. जातीचे ५ दाखले, अधिवास २ दाखले व १५ उत्पन्न दाखले देण्यात आले. तसेच सातबारा, आठ अ ,फेरफार महसुली कागदपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच महसुल प्रशासन विभागाकडून यावेळी सातबारात जुनी नावे कमी करणे, नवीन नावे चढविणे, सातबारा फेरफार नोंदी माहिती व ई पीक पाहणी व अँग्री स्टॅक शेतकरी माहिती देण्यात आली.