ऐसे कैसे झाले भोंदू?
अध्याय नववा
अनन्यतेने बाप्पांची भक्ती करणारा जरी अडाणी असला तरी भक्तीच्या बलावर बाप्पांची कृपा होऊन त्याला आत्मज्ञान प्राप्त होते म्हणून तो अडाणी असला तरी विद्वान समजावा हे सांगून झाल्यावर बाप्पा पुढे म्हणाले, जो माझी भक्ती न करता केवळ माझी भक्ती करण्याचे नाटक करतो तो खालच्या दर्जाचा समजावा आणि जो श्रद्धेने माझी भक्ती करतो तो वरच्या दर्जाचा समजावा. ह्या अर्थाचा भजन्भक्त्या विहीनो यऽ स चाण्डालोऽ भिधीयते। चाण्डालोऽ पि भजन्भक्त्या ब्राह्मणेभ्योऽ धिको मतऽ ।। 8 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. या श्लोकात बाप्पा माणसाच्या मानसिकतेवर प्रकाश टाकत आहेत. ते म्हणतात, काही लोक माझी भक्ती करताहेत असं समाजाला दाखवण्यासाठी, भक्ती करण्याचं नाटक करत असतात पण माझ्याविषयी त्यांच्या मनात बिलकुल भक्तिभाव नसतो. समाजात असे कित्येक भोंदूबाबा वावरत असतात. बोलताना ते मोठ्या लंब्याचवड्या बाता मारत असतात. त्यात मी कसा महान आहे, माझ्यावर देव कसा प्रसन्न आहे हे ते अगदी खुलवून सांगत असतात. आपण श्रेष्ठभक्त आहोत असा आव आणतात आणि स्वत:चा मोठेपणा मिरवत असतात. प्रत्यक्षात मात्र असे भक्त माझ्यादृष्टीने अत्यंत हीन काम करत असतात. मात्र केव्हा ना केव्हा ते उघडे पडतातच.
श्रीगजानन महाराजांच्याकडे विठोबा घाटोळ म्हणून असाच एक ढोंगी माणूस होता. महाराजांच्या पुढं भक्तजन मिठाई पेढे वगैरे ठेवत असत. ते पाहून हा भोंदूबाबा अतिशय खुश होई आणि ती सर्व मिठाई हा खाऊन टाके. आल्यागेल्या समोर हा फुशारकी मारे की, माझ्यावर समर्थांची अत्यंत कृपा आहे. माझ्याशिवाय त्यांचे पान हलत नाही. मी त्यांचा अत्यंत आवडता आहे. त्यांची सर्व कामे मीच करतो. अगदी मी त्यांचा कल्याणच आहे म्हणाना! असे तो सर्वांना सांगे. इतरांना जरी त्याचे बोलणे खरे वाटत असले तरी अंतर्यामी असलेले महाराज, सर्व जाणून होते. त्यांनी त्याची खोड मोडायची ठरवले आणि कशी गंमत केली पहा, परगावातली काही मंडळी एकदा स्वामींच्या दर्शनाला आली होती पण त्यावेळी श्रीमहाराज निजलेले होते. आलेल्या मंडळींना परत जाण्याची घाई असली तरी महाराजांना उठवायचे धाडस कोणच करेना! त्यांनी ही गोष्ट विठोबाच्या कानावर घातली. म्हणाले, ‘अरे, तू त्यांचा एवढा आवडता शिष्य आहे म्हणतोस तर काहीतरी करून आम्हाला महाराजांचे दर्शन घडव!’ त्यांनी केलेल्या स्तुतीने विठोबा फुगून गेला. आत जाऊन त्याने महाराजांना उठवले. आलेल्या मंडळींचे दर्शनाचे काम झाले पण विठोबावर संकट ओढवलं. समर्थांच्या हातात एक काठी होती. तीच त्यांनी त्याच्या पाठीत घातली. म्हणाले, ‘कारे फार मस्ती आलीये का? तू काय उघड उघड व्यापारच मांडलायस की! तू केलेला अपराध नजरेआड करून तुझ्यावर जर मी कृपा केली तर मी देवाचा अपराधी होईन! विषाला कधी जवळ ठेवतात का? चोराला कधी गळ्यातला ताईत करतात का? असा विचार करून महाराजांनी घाटोळाला छडीने ठोकून काढला. मार खाऊन विठोबा जो पळाला, तो पुन्हा फिरकला नाही! खरे संत चोरांना दूर करतात. ते लबाडांना ओळखून असतात. त्यांना हेही माहीत असतं की, पूर्वकृत्यानुसार ते भूमीवर वावरतायत! म्हणून ते त्यांच्याकडं फारसं लक्ष देत नाहीत. विठोबा जर सरळपणे राहिला असता तर काही एक योग्यता प्राप्त करता झाला असता. पण त्यानं मिळालेली सुसंधी वाया घालवली. याला म्हणतात, विनाशकाले विपरीत बुद्धी!
तुकाराम महाराजांना तर असे भोंदू होतातच कसे असे आश्चर्य वाटते. त्यांना देवभक्ती करणे ही त्यांना मोठीच पर्वणी वाटत असल्याने ते साश्चर्य म्हणतात, ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनि म्हणती साधू । अंगा लावूनिया राख । डोळे झांकुनी करिती पाप । दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयांचा सोहळा? तुका म्हणे सांगो किती। जळो तयांची संगती ।।
क्रमश: