बोगदा कामगारांची रुग्णालयात तपासणी
उत्तराखंड मुख्यमंत्र्यांकडून 50 हजारांची साहाय्यता, नातेवाईकांचा उत्स्फूर्त जल्लोष
वृत्तसंस्था / उत्तरकाशी
उत्तराखंडच्या सिल्क्यारा बोगद्यात 17 दिवस अडकलेले कामगार सुखरुप बाहेर आल्यानंतर त्यांना मंगळवारी रात्री उशीरा हेलिकॉप्टरमधून ऋषिकेश येथील अखिल भारतीय वैद्यकीय संस्थेच्या (एम्स) रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले आहे. सर्व कामगार सुखरुप असून त्यांची प्रकृतीही चांगली आहे. मात्र, दक्षतेचा उपाय म्हणून त्यांची सर्वंकष तपासणी करण्यात येणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले. बुधवारी सकाळी त्यांची तपासणी संपली असून त्यांना अन्यत्र हलविण्यात आले.
सर्व कामगारांना मंगळवारी रात्री साधारणत: साडेआठला बोगद्याबाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी उत्स्फूर्त जल्लोष केला. त्यांच्या आनंदात साहाय्यता कार्यात सहभागी झालेले कर्मचारी आणि अधिकारीही सहभागी झाले होते. सुटका झालेल्या सर्व कामगारांची प्रकृती धडधाकट असून ते त्यांचा नियमित आहारही घेत आहेत. त्यांच्यावर फारसे औषधोपचार करावे लागतील अशी स्थिती नाही. ते काही दिवसांनंतर त्यांच्या कामालाही प्रारंभ करु शकतात. एकंदर, हे सुटका अभियान यशस्वीरित्या पार पडले आहे, अशी माहिती देण्यात आली.
50,000 ची साहाय्यता
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी सुटका झालेल्या प्रत्येक कामगाराला 50 हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाईल, अशी घोषणा केली आहे. हे पैसे त्यांना प्रोत्साहन निधी म्हणून दिले जाणार आहेत. धामी यांनी मंगळवारी रात्री उशीरा सर्व कामगारांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि आनंद व्यक्त केला.
पंतप्रधान मोदींचा व्यक्तीश: संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतून सर्व कामगारांशी व्यक्तीश: दूरध्वनीवरुन संवाद साधला असून त्यांचे अभिनंदन केले आहे. अशा अडकलेल्या अवस्थेत सलग 7 दिवस कंठणे हे अतियश अवघड काम आहे. या आव्हानात्मक दिवसांमध्ये आपण सर्वांनी एकमेकांचा उत्साह वाढवून हे आव्हान यशस्वीरित्या पेलले. यासाठी तुम्ही अभिनंदनास पात्र आहात, असा संदेश त्यांनी कामगारांना दिला. त्यांनी नंतर सुटका करणाऱ्या कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला आणि त्यांचे अभिनंदन करुन आभारही मानले, अशी माहिती देण्यात आली आहे.
चिनयालीसौर येथे विश्रांती
घटनास्थळापासून 30 किलोमीटरवर असणाऱ्या चिनयालीसौर येथील विश्रामधामात आता हे सर्व कामगार विश्रांती घेत असून ते आणखी दोन दिवस तेथे वास्तव्य करणार आहेत. एम्समध्ये तपासणी झाल्यानंतर त्यांना येथे आणण्यात आले आहे. लवकरच ते त्यांच्या नित्य जीवनाला प्रारंभ करणे शक्य आहे.
स्थानिकांनाही आनंदाचे भरते
सिल्क्यारा बोगद्याच्या आसपासच्या गावांमध्येही या सुटका अभियानासंबंधी मोठी उत्सुकता होती. मंगळवारी रात्री साडेआठ वाजता अभियान यशस्वी झाल्यानंतर स्थानिक नागरीकांनाही मोठा आनंद झाल्याचे दिसून आले. त्यांनी मिठाई वाटून भावना व्यक्त केल्या. कामगारांच्या नातेवाईकांनाही मिठाई वाटण्यात आली.
तुमच्या नेतृत्वाचा आम्हाला अभिमान!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा दूरध्वनीवरुन प्रत्येक कामगाराशी संवाद साधला तेव्हा कामगारांनीही त्यांचे आभार मानले. ‘ते सर्व 17 दिवस आम्ही बोगद्यात बंधूंप्रमाणे राहिलो. कधीही आम्हाला निराशेने घेरले नाही. आपण विदेशात युद्धग्रस्त स्थितीत अडकलेल्या भारतीयांची सुटका करुन त्यांना भारतात परत आणले आहे. त्यामुळे आपण आमचीही सुटका निश्चितच कराल असा आम्हाला विश्वास होता. आपल्या नेतृत्वाचा आम्हाला अभिमान आहे. आम्हीही आपले मन:पूर्वक आभार मानतो,’ अशा शब्दांमध्ये कामगारांनी त्यांची भलावण केली.
17 दिवसांचा तणाव एकदम दूर
ड 17 तणावपूर्ण दिवसांनंतर मंगळवारी रात्री सर्वांकडून सुटकेचा नि:श्वास
ड सुटका झालेल्या कामगारांच्या प्रकृतीकडे लक्ष देण्यासाठी प्रशासन सज्ज
ड सर्व कामगार लवकरच पुन्हा त्यांच्या नित्य जीवनाला प्रारंभ करणे शक्य