For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अशा ‘आशां’मुळेच आशा...

06:22 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
अशा ‘आशां’मुळेच आशा
Advertisement

मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हे शहर प्रसिद्ध आहे. तेथील मंदिरांमुळे दूरवरून भाविक मंडळी तिथे दर्शनासाठी येत असतात. गेल्या सुमारे 50 वर्षात अंबाजोगाईला एक आणखी विशेष वारसा लाभला तो शैक्षणिक पंढरी होण्याचा. अल्पावधीतच या शहराने दर्जेदार  शिक्षणामुळे उभ्या महाराष्ट्रात आपल्या कार्य-कर्तृत्वाचा ठसा उमटवला. अशा या अंबाजोगाईच्या नाव लौकिकात आता वैशिष्ट्यापूर्ण भर पडली ती ‘आशा’ उपक्रमामुळे. योगायोग म्हणजे अंबाजोगाईच्या या आशादायी उपक्रमाची प्रयत्नशील सुरुवात करणाऱ्या महिलेचे नाव सुद्धा आशाच आहे.

Advertisement

अशा आशालता पांडे या अंबाजोगाईच्या. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. त्यानंतर दोन मुलींसह आशालताला सोडून तिचा नवरा घर सोडून गेला ते कधीही परत न येण्यासाठी. परिणामी आता तुला कसे वाटते इथंपासून  तर आता तुझे कसे होणार? या आणि अशा प्रयत्नांचा ससेमिरा तिच्या मागे लागला तो कायमचाच. यावर तोडगा व उदर निर्वाहाचे साधन म्हणून आशालता पांडे यांनी ‘आशा’ कर्मचारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. काम तसे आव्हानपर होतेच मात्र त्यांनी आपली जिद्द आणि प्रयत्न सुरुच ठेवले. तशातच त्यांची गाठ चित्राताई या समवयीन व समदु:खी सखीशी पडली. चित्राताईंची ओळख व सहवास यातून आशालताच्या जीवनाचे चित्रच पलटून गेले. त्यांच्या जीवनाला नवे वळण आणि दिशा मिळाली होती.

चित्राताईंच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनामुळे आशालता महिला स्वयंसहाय्यता, बचत गटाच्या सदस्य, कार्यकर्त्या बनल्या. महिला स्वयंसहाय्यता बचतगटाच्या व्यवस्थेतून आशालताला महिला मूलभूत नेतृत्व क्षमता विकास अभ्यासक्रमात प्रवेश मिळाला. या अभ्यासक्रमाचा मुख्य फायदा म्हणजे त्यांना त्यांच्या सारख्या महिलांच्या हक्कांची जाणीव झाली. पतीच्या मिळकतीत त्यांचा कायदेशीर वाटा त्यांना हक्क स्वरुपात मिळू शकतो हेदेखील समजले.

Advertisement

प्रत्यक्षात आशालता यांच्या सासऱ्याकडे पिढीजात घर होते. त्यांना या घरामध्ये रितसर हिस्सा हवा होता तो त्यांना कायद्याने मिळाला. त्यांच्या या प्रयत्नात मराठवाड्यात महिला जागृती व हितरक्षणासाठी काम करणाऱ्या व विविध कारणांनी एकाकीपणे जीवन जगणाऱ्या एकल महिला संघटनेचे विशेष सहाय्य व मार्गदर्शन लाभले. या संघटनेच्या सदस्य महिलांची मराठवाड्यातील संख्या सुमारे 22,000 आहे हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. या सदस्य महिलांना संस्थेतर्फे त्यांच्या एकाकीपणाच्या पार्श्वभूमीवर स्वावलंबनासह सन्मानाने जगण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाते.

एका महिला संघटनेची स्थापना मराठवाड्यात सुमारे 10 वर्षांपूर्वी झाली. संघटनेचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने मराठवाड्यातील बीड, लातूर, नांदेड व धाराशीव या जिल्ह्यांपुरते आहे. आशालता या संस्थेच्या महिला अत्याचार विरोधी विभागासाठी  सक्रियपणे कार्यरत असून त्यादृष्टीने त्यांचे महिला जागृतीचे काम सुरू आहे. संस्थेच्या कार्यकर्तृत्वामुळे व सक्रिय प्रयत्नांतून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात आवाज उठविण्याशिवाय अशा महिलांना मार्गदर्शन करणे, त्यांना सामाजिक अवहेलनेपासून मुक्तता देणे, कौटुंबिक हिंसाचार प्रसंगी संरक्षण, मार्गदर्शन करणे, कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे, गरजुंच्या निवासाची व्यवस्था करणे व या महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी रोजगार-स्वयंरोजगार विषयक मदत व मार्गदर्शन केले जाते.

आजमितीस संस्थेशी संबंधित सुमारे 500 संलग्न संस्था महाराष्ट्र व राजस्थानमध्ये कार्यरत आहेत. या संस्थांना स्थानिक स्वयंसेवी संस्थांची पण साथ मिळत असते. संस्थेतर्फे पीडित महिलेच्या प्रश्नांची महिलांकरवी सोडवणूक हे ध्येयवाक्य निश्चित करण्यात आले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. याचा लाभ संबंधित महिलांना होत आहे हे विशेष. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून महिला सक्षमीकरण प्रबळ करण्याच्या उद्देशाने महिला नेतृत्व सक्षमीकरण हा उपक्रम विशेषत्वाने राबविण्यात येत आहे. संस्थेतर्फे महिलांद्वारा महिलांचे नेतृत्व या विषयावरील विशेष प्रशिक्षण आयोजित केले जाते. गेल्या सुमारे 10 वर्षात या नेतृत्व विकास विषयक प्रशिक्षणाचा लाभ सुमारे 69 टक्के सदस्य महिलांनी घेतला असून त्याद्वारे महिलांमधूनच सक्रिय नेतृत्वाची एक मोठी फळी तयार झाली आहे. यामध्ये ग्रामीण व मागास वर्गीय समाजातील महिलांची संख्या मोठी आहे. बालपणापासून वा प्रसंगी लग्न झाल्यानंतर पण विविध प्रकारे संधी नाकारल्या जाण्यापासून वाऱ्यावर सोडल्यागत जीवनाला एकाकीपणे सामोरे जाणाऱ्या या महिलांमधून आता कार्यरत व करारी नेतृत्व पुढे येत आहे.

महिला नेतृत्व क्षमता विकास उपक्रमाला मिळणारा वाढता प्रतिसाद व त्याचे गरजू व तळागाळातील महिलांवर होणारे सकारात्मक परिणाम पाहता या अभ्यासक्रमाला अधिक व्यापक व परिणामकारक नव्याने रचना करण्यात आली आहे. त्यानुसार आता महिला नेतृत्व क्षमता विकास अभ्यासक्रमाला महिलांच्या मुलभूत व कायदेशीर हक्कांप्रती जनजागृतीच्या माध्यमातून प्रबोधन करणे, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शकांना प्रशिक्षित करणे, महिलांना आपल्या अडचणी व व्यथा मांडण्यासाठी त्यांना संवाद विषयक प्रशिक्षण देणे, त्यांना अधिक साक्षर बनविणे, आर्थिक व्यवहारांची मुलभूत माहिती देणे, महिला सुरक्षा विषयक विविध मुद्यांच्या संदर्भात जागृती करून त्यानुसार कृती करणे इ. विविध मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे.

आता तर एकल महिला संघटनेने महिला सुरक्षा व गरीब आणि गरजू महिलांसाठी विविध प्रकारे लाभदायी ठरणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ आता महिलांना सहजशक्य झाला आहे. याचा लाभ विशेषत: एकाकी राहणाऱ्या वा एकटेपणे जीवन जगणाऱ्या महिलांना होत आहे. मुख्य म्हणजे अशा लाभार्थी महिलांना आता आर्थिक फायद्यांद्वारे सुरक्षा व स्वावलंबन प्राप्त झाले आहे. त्यांच्या कौटुबिक व सामाजिक स्तरांमध्ये सुधारणा झालेली दिसून येत आहे. त्यातून या महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे.

कधी घरगुती व कौटुंबिक स्तरावर विविध समस्यांना सामोरे जावे लागलेल्या राजस्थानच्या ग्रामीण भागातील टीना रावत यांनी आपल्यासारख्या महिलांपुढे उभ्या ठाकणाऱ्या अत्याचारी समस्यांचा सामना करण्यासाठी जिद्दीने शिक्षण घेऊन पदवी व कायद्यातील पदवी उत्तीर्ण केली. आज त्या राज्याच्या विविध भागात केवळ महिला अत्याचाराच्या प्रकरणीच वकिली करीत असून अशा महिलांना न्यायालयातून त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतात. एका महिलेच्या तक्रारी प्रकरणी न्याय निवाडा करताना स्थानिक न्यायालयाने टीना रावत यांची जिद्द आणि प्रयत्न म्हणजे घुंघटपासून काळ्या कोटापर्यंतचे मोठे परिवर्तन असल्याचे आवर्जुन नमूद केले आहे.

एकल महिला संघटनेची स्थापना झाल्यापासून गेल्या दशकात महाराष्ट्र व राजस्थानातील सुमारे 250 तालुक्यांपर्यंत आपल्या कामाचा विस्तार केला आहे. या क्षेत्रातून संस्थेने 1600 महिलांना नेतृत्व विकासाचे प्रशिक्षण दिले आहे. याचा लाभ 3000 हून अधिक गावांमधील गरजू महिलांना मिळाला आहे. यातूनच प्रशिक्षित झालेल्या गरजू महिला आपल्या वैयक्तिक समस्यांवर मात करत महाराष्ट्रात आज 22 महिला आपापल्या क्षेत्रातील अन्याय व अत्याचारग्रस्त महिलांच्या समस्यांची यशस्वीपणे सोडवणूक करतानाच या महिलांमधून आशादायी नेतृत्व निर्माण करीत आहेत.

- दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :

.