गृहमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा
पावसाळी नियोजनाबाबत अधिकाऱ्यांना सूचना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पावसाळ्यात देशाच्या विविध भागांतील पुराचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी बैठक घेतली. त्यात गृह, जलसंपदा, नदी विकास, पृथ्वी विज्ञान, पर्यावरण, रस्ते वाहतूक मंत्रालय आणि विभागांचे सचिव, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, एनडीएमएचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी गृहमंत्र्यांनी पुराचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेत अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले.
मुसळधार पावसामुळे अनेक भागांना मोठा फटका बसतो. याला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने जोरदार तयारी केली आहे. याचदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सक्रिय झाले आहेत. देशातील पूर व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली. देशात मान्सूनने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. मान्सून आता बिहारपाठोपाठ उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचत आहे. दिल्लीतही मान्सूनची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.
दरवषी मान्सूनच्या पावसामुळे विविध नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बिहार, आसाम आणि इतर पूर्वेकडील राज्यांतील अनेक भाग पाण्याखाली जातात. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि इतर काही राज्यांनाही पावसाळ्यात भूस्खलन आणि पावसाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. तामिळनाडू, केरळ आणि जम्मू-काश्मीरमध्येही अलीकडच्या काही वर्षात पूराचा सामना करावा लागला आहे.
अमित शहांव्यतिरिक्त केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील आणि गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी पुराचा सामना करण्याच्या तयारीसंदर्भातील आढावा बैठकीत भाग घेतला. याशिवाय गृह मंत्रालये आणि विभागांचे सचिव, जलसंपदा, नदी विकास आणि नदी संवर्धन, पृथ्वी विज्ञान, पर्यावरण, वन आणि हवामान बदल, रस्ते वाहतूक आणि महामार्गाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच एनडीआरएफ आणि आयएमडीचे महासंचालक, सीडब्ल्यूसीचे अध्यक्ष, एनएचएआय आणि संबंधित मंत्रालयांचे इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.