हिजबुल मुजाहिदीनची युद्धाची घोषणा
आयएसआयने दहशतवाद्यांना केले सक्रीय
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
प्रॉक्सी दहशतवादी संघटनांचा भारताच्या विरोधात वापर करण्याचे मॉडेल पाकिस्तानने दीर्घकाळापासून अवलंबिले आहे. अलिकडेच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता असताना हिजबुल मुजाहिदीनने युद्धाची घोषणा केली आहे. पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या निर्देशानुसार या दहशतवादी संघटनेने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनचा टॉप दहशतवादी शमशेर खानचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओला दहशतवादी संघटनेच्या सोशल मीडिया अकौंटवरून 24 एप्रिल रोजी जारी करण्यात आला असून यात काश्मीरमध्ये जिहादची घोषणा करण्यात आली आहे. या दहशतवादी संघटनेने भारताच्या विरोधात सशस्त्र संघर्ष सुरू करण्याची घोषणा केली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाचे वातावरण आहे. या हल्ल्यात सामील आणि या हल्ल्यामागील दहशतवाद्यांना कठोरातील कठोर शिक्षा केली जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले आहे. यामुळे पाकिस्तानला आता भारताच्या प्रत्युत्तराची भीती सतावू लागली आहे. याचमुळे पाकिस्तानने दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून भारताच्या विरोधात संघर्षाची तयारी चालविली आहे.
दहशतवादी संघटनेने जारी केलेला व्हिडिओ एक मिनिटाचा असून यात शमशेर खान दिसून येत असून तो काश्मीरच्या पुंछ येथील रहिवासी आहे, परंतु आता तो पाकिस्तानात लपून बसला आहे. शमशेर खान हा सैयद सलाहुद्दीन गटाचे नेतृत्व करतो. यापूर्वी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाचा मुखवटा असलेल्या टीआरएफने स्वीकारली होती.
पहलगाम येथील हल्ल्याचा कट एलईटीचा दहशतवादी सैफुल्लाह कसूरीने रचला होता. तो एलईटीच्या राजकीय शाखेचेही नेतृत्व करतो. एलईटीच्या दहशतवाद्यांना सध्या पाकिस्तानी अधिकारी सुरक्षा पुरवित आहेत.