वळीव पावसाने शहर परिसराला झोडपले
पहिल्याच दमदार पावसाने उडविली तारांबळ : झाड कोसळून कारचे नुकसान, काही भागात वीजपुरवठा खंडित
बेळगाव : शहरवासियांना प्रतीक्षा असलेल्या वळीव पावसाने शुक्रवारी शहरासह उपनगरांना चांगलेच झोडपून काढले. जोरदार वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह सायंकाळी 4 च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. या पावसाने साऱ्यांचीच दाणादाण उडविली. अनेक ठिकाणी गटारी भरून रस्त्यांवरून पाणी वाहत होते. या पावसाने अनेकांच्या घरांमध्येही पाणी शिरले होते. पावसाबरोबरच जोरदार वाऱ्यामुळे झाडे कोसळून वाहनांचे नुकसान झाल्याच्या घटनाही घडल्या. पहिल्याच दमदार पावसाने साऱ्यांचीच तारांबळ उडविली आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्म्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत होती. पाऊस कधी पडेल, याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून होते. दोन दिवसांपूर्वी पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर पावसाने पुन्हा उसंत घेतली होती. त्यामुळे आणखी उष्म्यामध्ये वाढ झाली होती. सकाळपासूनच आकाशात ढग दिसत होते. त्यामुळे पाऊस येईल, अशी अपेक्षा होती. सायंकाळी 4 च्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. 4.30 नंतर पावसाने अधिकच जोर धरला. मोठ्या पावसामुळे गटारी तुडुंब भरून वाहत होत्या.
अनगोळ येथील संतमीरा स्कूलच्या समोरच मारुती ओम्नी पार्किंग करण्यात आली होती. जोरदार वाऱ्यामुळे कारवर झाड कोसळल्यामुळे नुकसान झाले. सुदैवानेच या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. शाळेला सुटी असल्याने मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात होते.
पहिल्याच पावसाने दुकानांमध्ये शिरले पाणी
जुना पी. बी. रोडवर काही वर्षांपूर्वी ओव्हरब्रिजची उभारणी करण्यात आली आहे. या ओव्हरब्रिजला लागूनच अत्यंत लहान सर्व्हिस रस्ता आहे. त्या परिसरात अनेक दुकानदार व्यवसाय करत आहेत. मात्र दरवर्षी त्यांना पावसाचा फटका बसत आहे. शुक्रवारी पावसामुळे गटारी तुडुंब भरून दुकानांमध्ये घाण पाणी गेल्याने दुकानदारांची तारांबळ उडाली. या प्रकारामुळे व्यावसायिकांतून मनपाबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.