For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अरुणाचल प्रदेश, आसाममध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी

06:33 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
अरुणाचल प्रदेश  आसाममध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी
Advertisement

इटानगरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस, आसाममध्ये 4 लाख लोक बाधित, 37 जणांचा मृत्यू

Advertisement

वृत्तसंस्था/ इटानगर, गुवाहाटी

अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरमध्ये रविवारी सकाळी कोसळलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. याचदरम्यान अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरी भागासोबतच राष्ट्रीय महामार्ग-415 वर पाणी साचल्याने अनेक वाहने अडकून पडली होती. आसाममध्येही गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या निर्माण झालेली पूरस्थिती अद्याप ओसरलेली नाही.

Advertisement

आसाममध्ये जवळपास आठवडाभरापासून पाऊस कोसळत आहे. राज्यातील 19 जिल्ह्यांतील सुमारे 4 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. यावषी पूर आणि भूस्खलनामुळे मृतांचा आकडा 37 वर पोहोचला आहे. पूरग्रस्तांसाठी सरकारने 100 मदत छावण्या उभारल्या आहेत. मदत सामग्री पुरविण्यासाठी 125 केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. दरम्यान, पूर्व आणि दक्षिण भारतात पाऊस कोसळत असताना उत्तरेकडील हरियाणा आणि उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट कायम आहे. पंजाब आणि दिल्लीतही 25 जूनपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

मध्यप्रदेशसह 11 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

हवामान खात्याने मध्यप्रदेशसह 11 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मध्यप्रदेशसोबतच गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 22 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र, बिहार, झारखंड, गुजरात-महाराष्ट्राचा काही भाग, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये पोहोचला आहे. आता पुढील 3-4 दिवसात ही राज्ये पूर्णपणे व्यापली जातील. तसेच 27 जूनपर्यंत मान्सून दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये दाखल होईल, असेही सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.